अखेर युद्ध संपणार? अमेरिका-इराण शांतता कराराबाबत मोठी अपडेट; पाकिस्तानी मंत्र्याने सगळं सांगितलं!
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जलवाहतुकीच्या मुद्द्यावरून दोन्ही देश आडून बसलेले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही आता थेट हल्ला करण्याऐवजी चर्चेच्या मार्गाने वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विधान केले होते.

America Iran War : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चालू आहे. इराण देशाचे प्रमुख अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हा संघर्ष आणखी वाढला. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर अनेक हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे इराणनने आक्रमक पवित्रा घेतल्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपल्या सैन्याला अलर्ट राहण्याचा आदेश दिलेला आहे. अमेरिकेने आखाती देशांतील आपल्या लष्करी तळांवरील कुमक वाढवलेली आहे. एकीकडे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दोन्ही देशांत शांतता करार प्रस्थापित व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांत पाकिस्तान देश महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच चर्चेविषयी आता महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश शांतता कराराच्या जवळ आहेत.
नेमकी माहिती काय?
अल जजिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि इराण एका सामंजस्य कराराच्या जवळ पोहोचले आहेत. तशी माहिती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी दिली आहे. आता दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. शांतता कराराबाबत आता सकारात्मक बाबी घडून येत आहेत. दोन्ही देश शांतता कराराच्या जवळ आहेत, असं ख्वाजा असीफ यांनी सांगितलं आहे. ख्वाजा असिफ यांनी आता नुकतेच ब्लुमबर्गला एक मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
अमेरिका-इराण युद्धात सध्या काय घडतंय?
सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जलवाहतुकीच्या मुद्द्यावरून दोन्ही देश आडून बसलेले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही आता थेट हल्ला करण्याऐवजी चर्चेच्या मार्गाने वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विधान केले होते. ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर लवकरच दोन्ही देशांतील वाद संपू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानानंतर लवकरच युद्ध संपू शकते, दोन्ही देशांमधील वाद निवळू शकतो, या शक्यतेला बळ मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.