पाकिस्तानने लपवले जिथे अणुबॉम्ब; ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याच किराणा हिल्सवर अटॅक, सॅटेलाईट फोटातून मोठा खुलासा

Operation Sindoor : पाकिस्तानमधील किराणा हिल्स या ठिकाणी अणुबॉम्ब आहेत. ताजा सॅटेलाईट चित्रांनी आात मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये या ठिकाणी हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानने लपवले जिथे अणुबॉम्ब; ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याच किराणा हिल्सवर अटॅक, सॅटेलाईट फोटातून मोठा खुलासा
किराणा हिल्सवर भारताचा हल्ला?
| Updated on: Jul 20, 2025 | 3:01 PM

Kirana Hills : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केली होती. पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण सर्व हल्ले चुकले. भारताने प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाक एअरफोर्सचे अनेक एअरबेस उद्धवस्त झाले. तर आता ताज्या सॅटेलाईट छायाचित्रातून मोठा खुलासा झाला आहे. भारतीय क्षेपणास्त्रने किराणा हिल्सवर पण हमल्ला केल्याचे समोर आले आहे. शेजारी देश याच टेकड्यांमध्ये अणुबॉम्ब ठेवत असल्याचा दावा करण्यात येतो.

गुगल अर्थ सॅटेलाईट छायाचित्रात संकेत मिळाले आहेत की, पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील किराणा हिल्सवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. ही छायाचित्रे जून 2025 मध्ये सॅटेलाईट इमेजरी एक्सपर्ट डेमियन सायमन यांनी सार्वजनिक केली. सायमन यांनी X वर गुगल अर्थच्या छायाचित्रांआधारे या ठिकाणी भारताकडून हल्ला करण्यात आल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. भारतीय वायुदलाने मात्र त्याचवेळी किराणा हिल्सवर हल्ल्याचा इनकार केला होता. पाकिस्तानने जिथे अणुबॉम्ब लपवला तिथे हल्ला केला नसल्याचे वायुदलाने म्हटले होते.किराणा हिल्स हे पाकिस्तानचे अणुबॉम्ब, अणुशक्ती कार्यक्रमचा एक अत्यंत सुरक्षित भाग मानल्या जातो. या परिसरात भूमिगत बोगदे, रडार स्टेशन आणि अणुचाचण्यांसाठी सुविधा आहेत. १९८० च्या दशकात येथे सब-क्रिटिकल अणुचाचण्या घेण्यात आल्याचा दावा पाककडून करण्यात आला होता.

23 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला होता. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल्यानंतर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानच्या एअरबेसचे मोठे नुकसान झाले. दोन्ही देशांनी अचानक यु्द्ध थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्यामुळे दोन्ही देश युद्धविरामावर राजी झाल्याचा दावा केला. 10 मे 2025 रोजी दोन्ही देश युद्धविरामावर राजी झाले. तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशात युद्धबंदीचे क्रेडिट घेत आहेत. भारतच नाही तर पाकिस्तानमधील अनेक नेते त्यावर आक्षेप घेत आहे. युएई आणि इतर अरब देशांनी यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा पाकिस्तानने यापूर्वी केला होता. तर आता ताज्या छायाचित्रामुळे पाकिस्तानला तीन दिवसांच्या संघर्षात सपाटून मार खावा लागल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.