कृत्रिम पावसासाठी विमान ढगात फिरलं, रिकाम्या हाती परतलं

| Updated on: Aug 14, 2019 | 10:00 PM

गेल्या सहा दिवसात कृत्रिम पावसाचे (Artificial rain) प्रयोग झाले. मात्र अपेक्षीत ढग न मिळाल्याने पाऊस पडलाच नाही. त्यामुळे मराठवाड्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

कृत्रिम पावसासाठी विमान ढगात फिरलं, रिकाम्या हाती परतलं
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या चाचणीसाठी सोलापूरचं मागवलेलं विमान परतलं आहे. कृत्रिम पावसाच्या (Artificial rain) प्रयोगासाठी अमेरिकेहून मागावलेलं विशेष विमान दुबईमध्ये थांबलं. ते गुरुवारी अहमदाबाद येथे पोहोचणार असून शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादेत दाखल होणार आहे. गेल्या सहा दिवसात कृत्रिम पावसाचे (Artificial rain) प्रयोग झाले. मात्र अपेक्षीत ढग न मिळाल्याने पाऊस पडलाच नाही. त्यामुळे मराठवाड्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

राज्यभरात चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणं अजूनही तळाला आहेत. पाण्यासोबतच जनावरांचाही प्रश्न निर्माण झालाय. सोलापूर जिल्ह्यातही अजून अनेक चारा छावण्या सुरुच आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना भ्रमंती करावी लागत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु केला. यापूर्वी या प्रयोगाला यश आलं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यावर्षीही हे विमान क्लाऊड सीडिंगसाठी फिरवण्यात आलं. पण त्याचा शून्य उपयोग झाला. खर्चही व्यर्थ गेलाय आणि वेळही गेला. त्यामुळे अमेरिकेहून विमान मागवण्यात आलंय, ज्याद्वारे पुन्हा एकदा प्रयोग होणार आहे.

पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा?

9 ऑगस्टला ज्या विमानाने प्रयोग सुरु करण्यात आला तो फक्त ‘प्रयोग’ होता, असं आता सांगितलं जातंय. कारण, खरं विमान गुरुवारी अहमदाबादेत दाखल होईल, नंतर ते कस्टमची प्रक्रिया पूर्ण करुन औरंगाबादला आल्यावर पुन्हा नव्याने क्लाऊड सीडिंग सुरु होईल. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 31 कोटींची तरतूद करत कॅथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टन्ट या कंपनीला कंत्राट दिलंय. पण या कंपनीकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होतोय. अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपलाय, पण अजून विमानच न आल्याने संताप व्यक्त केला जातोय.

जायकवाडी धरणाची शंभरीकडे वाटचाल

पावसाने पाठ फिरवली असली तरी नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरण 91 टक्के भरलंय. यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना फायदा होणार आहे.

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.