पुणे- जुन्नर, आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर कायमच त्रासदायक ठरत आहे. आतापर्यंत बिबट्यानं माणसांवर हल्ला केल्याच्या, जनावरांना
उचलून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात दीड वर्षाचा कृष्णा गाढवे, हा मुलगा आज सकाळपासून गायब झाला आहे. घराच्या अंगणात तो खेळत असतानक अचानक गायब झाल्यानं गावासह आजूबाजूच्या परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. कृष्णा गायब झाल्यानंतर कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्याच खूप शोध घेतलं मात्र तो कुठेही आढळून आला नाही. या गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असून, काही दिवसांपूर्वीच कृष्णाच्या दारातील शेळीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कृष्णा गायब झाला असून त्याला बिबट्यानं हल्ला करत ऊसाच्या शेतात नेल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिली असून, वन विभागाची टीम गावात दाखल झाली आहे. गावकऱ्यांच्या मदतीनं ऊसाच्या शेतात कृष्णाचा शोध घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अद्याप कृष्णा सापडला नसून ऊसाच्या शेतात त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
या परिसरातील नागरिकांना सातत्यानं होत असलेलाबिबट्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तसेच वन विभागानं तातडीनं पावलं उचलावीत. तसेच ठिकठिकणी पिंजरे लावून त्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महाराष्ट्रातील ऊसाचा पट्टा असलेल्या अनेक भागात बिबट्याचा वावर वाढत असून , यामुळं स्थानिकांना जीवमुठीत धरून राहावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही मजुरीसाठी आलेल्या राजस्थानच्या मजूर कुटुंबातील लहानग्या चिमुरडीला बिबट्यानं हल्ला करत उचलून नेल्याची घटना घडली होती. चिमुरडीचा शोध घेतल्यानंतर दोन- तीन दिवसात ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला होता.
संबंधित बातम्या :
पालखी मार्गाच्या कार्यात महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही
पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री
पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी