स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा

सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रत्येक राज्यात अडकून पडलेल्या मजुरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च स्थानिक कॉंग्रेस करणार आहे (Congress to bear cost of Railway Travel of migrant labors)

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा
| Updated on: May 04, 2020 | 9:37 AM

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व प्रदेश काँग्रेसला रेल्वे प्रवास खर्चाची तरतूद करण्याच्या सूचना केल्या आहेत. (Congress to bear cost of Railway Travel of migrant labors)

केंद्राने गुजरातच्या एका कार्यक्रमात वाहतूक आणि अन्नपदार्थांवर 100 कोटी उधळले. रेल्वेकडे पीएम केअरला देण्यासाठी 151 कोटी आहेत. मग मजुरांना मोफत रेल्वे प्रवास का नाही? असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे. मानवतेच्या दृष्टीने विचार करुन रेल्वेने स्थलांतरित मजुरांकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच केंद्राला केली होती.

‘कोरोना संकटाच्या काळात अडचणीत आलेल्या गरीब, कष्टकरी, मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजुरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च स्थानिक कॉंग्रेस करणार आहे’, असं महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ट्विटरवरुन स्पष्ट करण्यात आलं.

हेही वाचा : परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वे तिकीट आकारु नये, मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

‘आपले कामगार हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. केंद्र सरकारने जेमतेम चार तासांची मुदत दिल्याने स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्याची संधी मिळाली नाही. 1947 च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर मजुरांना शेकडो किलोमीटर पायपीट करताना पाहिलं. तेही अन्न-औषध, पैसे किंवा वाहतूक व्यवस्था नसताना’ असं सोनियांनी पत्रात लिहिलं आहे.

‘देशाच्या कानाकोपऱ्यात लाखो मजूर अडकले आहेत. पण ना त्यांना पैसा दिला जात आहे, ना मोफत वाहतूक व्यवस्था. अशा कठीण काळात त्यांच्याकडून प्रवासाचे पैसे वसूल करणं धक्कादायक आहे’ असंही सोनिया गांधी म्हणतात. त्यामुळे प्रत्येक प्रदेश कॉंग्रेस मजुरांचा रेल्वे प्रवासखर्च उचलेल, असा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.