Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
भारत इंग्लंड वनडे मालिका नुकतीच पार पडली. पण ही मालिका गमावल्यानंतर खेळाडूंच्या फिटनेसबाबत बरीच चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच काय तर कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलनेही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आता सहा खेळाडूंमुळे टेन्शन वाढलं आहे.

भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही दिवसात सुमार दर्जाची होत आहे. टी20, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे चॅम्पियन टीम इंडियाला झालं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर मैदानात खराब कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात एक दोन नाही तर सहा खेळाडू जखमी आहे. त्यामुळे संघाची मोट बांधणं कठीण झालं आहे. रिपोर्टनुसार, बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये क्रिकेटपटूंची उपचारासाठी रांग लागलीय. या आठवड्यात सीओईमध्ये 12 खेळाडू येण्याची शक्यता आहे. म्हणजेच 12 खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न आहे. या खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेटरचाही समावेश आहे.
कोणते खेळाडू दुखापतग्रस्त?
टीम इंडियाच्या जखमी असलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही समावेश आहे. यासह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेल्या वरूण चक्रवर्ती आणि हर्षित राणा हे देखील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार घेत आहेत. आकाश दीपवर आधीच उपचार सुरू आहेत. तर वॉशिंग्टन सुंदरसह इतर खेळाडू लवकरच उपचारासाठी सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये दाखल होणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेत पुढच्या महिन्यात कसोटी मालिका पार पडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेपूर्वी काही खेळाडूंची फिटनेस देखील घेतली जाणार आहे. यात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांची नावं आहेत.
भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड मालिकेसाठी फिट नव्हते. तरीही त्यांची संघात निवड केली गेली. हर्षित राणाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचं वजन खूपच घटलं होतं. पण असं असूनही त्यात सुधारणा होण्याआधीच संघात स्थान मिळालं. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदर टी20 वर्ल्डकप 2026साठी फिट नव्हता. पण त्याला संघात घेतलं गेलं. संघात घेतल्यानंतर 10 ते 12 सामने झाले आणि फिट झाला होता. दरम्यान, फिटनेसच्या चिंतेमुळे भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं झालं आहे. झेल सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अवांतर धावाही जात आहेत.
