निवडणुकीच्या घोषणेसोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येणार!
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. दोन-दोन हजार रुपयांच्या टप्प्याने वर्षातून तीन वेळा हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मोदी सरकारची ही घोषणा आणि निवडणुकीचं टायमिंग जुळून येणार आहे. कारण, […]
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. दोन-दोन हजार रुपयांच्या टप्प्याने वर्षातून तीन वेळा हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
मोदी सरकारची ही घोषणा आणि निवडणुकीचं टायमिंग जुळून येणार आहे. कारण, 1 मार्चला नवीन वर्षाची सुरुवात होईल त्या दिवशीपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात होईल. पहिला हफ्ता दोन हजार रुपयांचा येणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2018 पासूनचा लाभ दिला जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही टायमिंग जुळून येणार आहेत.
योजनेसाठी पात्रता काय?
अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हे अंतरिम बजेट सादर केलं. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना असं या योजनेला नाव देण्यात आलंय. पैशांअभावी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रकमेचा फायदा होईल. दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांवरील संकट हटत नाही. जीवनावश्यक गरज भागवण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रक्कमेमुळे हातभार लागेल, असं अर्थमंत्री म्हणाले. या योजनेचा फायदा देशातील 12 कोटी कुटुंबांना होईल. शिवाय योजनेचा वर्षाला एकूण खर्च 75 हजार कोटी रुपये असेल.
पैसे खात्यात कधीपासून येणार?
1 डिसेंबर 2018 पासूनच ही योजना लागू असेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी रक्कमेचा पहिला हफ्ता 31 मार्च 2019 पासून दिला जाईल, असं पियुष गोयल यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांना हा पैसा देण्यासाठी नवीन खातं उघडण्याची गरज नसेल. जनधन योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अगोदरच खातं उघडलेलं आहे आणि ते आधारशी लिंक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचण येणार नाही.
शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं पियुष गोयल म्हणाले. यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चाच्या दीड पट किमान हमीभाव देण्याची घोषणा केली होती.