शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत कोणीतरी विषारी औषध टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त कुटुंबाने तिचा मृतदेह शाळेच्या दारात आणून ठेवला
कोल्हापूर : शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात पाच दिवसांपूर्वी सानिका माळीवर विषप्रयोग झाला होता. (Kolhapur Student Poison Death)
शिरोळ तालुक्यातील शिरटीमध्ये पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी सानिकाचा मृत्यू झाला.
सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत कोणीतरी विषारी औषध टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूपूर्व जबानीत सानिकाने ही माहिती दिली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागण्यासाठी संतप्त नातेवाईकांनी विद्यार्थिनींना मृतदेह हायस्कूलच्या दारात ठेवला.
नेमकं काय घडलं?
सानिका माळी शिकत असलेल्या शाळेत पाच दिवसांपूर्वी दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायलं. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली.
सानिकाची प्रकृती गंभीर खालावल्यामुळे तिला शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. (Kolhapur Student Poison Death)