अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील जवळपास 25 लाख हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान, पंचनामे पूर्ण, विभागीय आयुक्तालयाचा अहवाल

| Updated on: Oct 29, 2020 | 9:21 AM

मराठवाड्यातील जवळपास 24 लाख हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयानं तयार केली आहे. या नुकसानापोटी सरकारनं शेतकऱ्यांना 2 हजार 546 कोटी रुपये द्यावेत अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल तयार झाल्यानं शेतकऱ्यांनी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील जवळपास 25 लाख हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान, पंचनामे पूर्ण, विभागीय आयुक्तालयाचा अहवाल
पावसाने शेतच वाहून गेले, तिथे पंचनामे कशाचे करणार, असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Follow us on

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळ मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील तब्बल 24 लाख 95 हजार 901 हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयानं तयार केला आहे. या अहवालानुसार एकट्या मराठवाड्यातील तब्बल 35 लाख 69 हजार 400 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 546 कोटी रुपयांची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण करुन मदत अहवाल सादर झाल्यामुळं शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. (Massive loss of 24 lakh hectares of agriculture in Marathwada due to heavy rains)

मुख्यमंत्र्यांकडून 10 हजार कोटीचं पॅकेज

शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांना नेमकी कशी मदत मिळणार?

  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
  • ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे.
  • म्हणजे ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.
  • अतिवृष्टीमुळं फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा
  • दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे.
  • मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं विभागवार विभाजन

  • रस्ते आणि पूल – २ हजार ६३५ कोटी
  • नगरविकास – ३०० कोटी
  • महावितरण उर्जा – २३९ कोटी
  • जलसंपदा – १०२ कोटी
  • ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – १ हजार कोटी
  • शेती आणि घरांसाठी – ५ हजार ५०० कोटी
  • एकूण – ९ हजार ७७६ कोटी रुपये

केंद्रानं राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये थकवले- ठाकरे

केंद्र सरकारकडे राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी, पूर्व विदर्भात आलेल्या पुरासंदर्भात ८०० कोटी आणि जीएसटी परताव्याचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. याबाबत केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करुनही ही रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर राज्यात ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु आहे, पण अजूनही पाहणीसाठी केंद्राचं पथक राज्यात आलं नसल्याचं ठाकरे म्हणाले.

10 हजार कोटींची मदत अपुरी- पंकजा मुंडे

10 हजार कोटीचं पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. सावरगाव इथं आयोजित ऑनलाईन दसरा मेळाव्यात त्यांनी सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा – पंकजा मुंडे

Massive loss of 24 lakh hectares of agriculture in Marathwada due to heavy rains