नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत

| Updated on: Nov 13, 2020 | 7:49 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखे आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाहीत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (sanjay raut reaction on nitish kumar politics)

नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत
Follow us on

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता बिहारमध्ये सत्ता स्थापन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जास्तीत जास्त मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी आणि नितीशकुमार सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहारच्या राजकीय घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखे आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाहीत, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. (sanjay raut reaction on nitish kumar politics)

मुख्यमंत्री नितीशकुमार हे एनडीएमधून बाहेर पडत असतील तर त्यांना भाजपकडून रोखलं जाऊ शकणार नाही का?, असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर असं कोणी कुणाला थांबवत नाही. सरकार चालवत असताना नितीशकुमारांनी सरकार म्हणून घेतलेले काही निर्णय अंडरस्कॅनिंग असतील किंवा त्यांच्या काही फायली अंडरस्कॅनिंग असतील असं तुम्हाला वाटत असेल… पण नितीशकुमार हे काही प्रमाणात शरद पवारांसारखेच आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत. राज्य चालवताना काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यात भ्रष्टाचारच झालाय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण तरीही असं जर कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराविषयी आत्मचिंतनच केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सध्याचं बिहारमधील एनडीएचं सरकार हे बहुमताच्या काठावरचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्व केंद्रीय मंत्र्यांनी बिहारमध्ये प्रचार केला. पण त्यांना दोनचंच बहुमत मिळलं. त्यामुळे कितीही जुळवाजुळव केली तरी नव्या सरकारला टेकू मिळत नाही, तोपर्यंत सरकार टिकणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रपती राजवट लागू करणं हा भाजपचा छंद आहे. तो ते अशावेळी पूर्ण करतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

म्हणून आम्हालाही जागा मिळाल्या नाही

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झालं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चिराग पासवान यांचा लोजपा हा जुना पक्ष आहे. तरीही त्यांचा एकच आमदार निवडून आला. पप्पू यादव हे बिहारमधील मोठे नेते आहेत. त्यांचाही पराभव झाला आणि त्यांच्या पक्षालाही जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्हालाही जागा मिळाल्या नाहीत, असं सांगतानाच तेजस्वी यादव हे तरुण नेते आहेत. राजदची धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहेत. या तरुण नेतृत्वाला मदत करणं हा आमचा हेतू होता. राज्यात परिवर्तन होत असताना त्यात मिठाचा खडा टाकावा असं आम्हाला वाटत नव्हतं, असंही राऊत यांनी सांगितलं.

भाजपच्यासोबत सत्ता स्थापन केल्यास त्यांना भाजपचं मांडलिक होऊन राहावं लागेल आणि तो त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये कधीही राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राऊत म्हणाले. नितीशकुमारांनी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना दगा दिला. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनीही दगा दिला होता. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे ते काय करतील याची काहीही शाश्वती देता येत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

लोजपाचे नेते चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. एवढ्या मोठ्या केंद्रीय सत्तेला पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी-शहांनी मनात आणलं असतं तर पासवान यांचं बंड मोडून काढलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे पासवान यांनी नितीशकुमारांचं 20 जागांवर नुकसान केलं. त्यामुळे नितीशकुमार बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले, असं राऊत यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

महाराष्ट्रात ‘लोटस’चं पीक येणार नाही; बिहारमध्ये भूकंप होऊ शकतो: संजय राऊत

(sanjay raut reaction on nitish kumar politics)