12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा संताप आहे. पूर्वीही बस मध्ये पेपर तपासताना शिक्षक दिसले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
12 वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका जळाल्या
| Updated on: Mar 13, 2025 | 12:36 PM

बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त होते. पण रिझल्टचही टचेन्शन त्यांच्या डोक्याला आहेच की… बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. किती मार्क मिळतील, आवडीची फिल्ड पुढे निवडता येईल की नाही, असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर ?

एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठी खळबळ माजलेली असतानाच आता मुंबईतीव विरारमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार मध्ये 12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

घरी तपासायला पेपर आणले आणि होत्याचं नव्हतं झालं..

12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या. या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, शिक्षिकेच्या निष्काळजी पणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. मात्र त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामान जळालंच पण त्यासोबत बारावीचे पेपरही जळून खाक झाले. उत्कर्ष शाळेतील हे पेपर असून एकूण 175 उत्तर पत्रिका जळाल्याचे समजते.

असे पेपर घरी आणता येतात का ? संताप व्यक्त

दरम्यान या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. असे पेपर घरी आणता येतात का ?, ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजी पणा आहे, पेपर जाळले की जळाले याचा बोलींज पोलीस तपास करत आहेत. यात ज्याचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले.

चक्क बसमध्ये तपासले बारावीचे पेपर

काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होते. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे होते. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकंदरच विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांचा हलगर्जीपणा होत असून या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us