अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार; सुनेत्रा पवारांची घोषणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. अहिल्यानगरमधील चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अहिल्यानगरमधील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठी घोषणा केली. अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आपण शासनाच्या वतीने एक चित्रपट काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. “अहिल्यादेवी होळकरांनी क्रांती घडवली. त्यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलं. महिलांचं सक्षमीकरण केलं आणि देशभरातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला”, असं त्या म्हणाल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्याश्वर मंदिरात महापूजा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री आणि राज्यभरातून भाविक उपस्थित होते.
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक
“मी याआधीही चौंडीला आले होते, पण आज राज्याची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून इथं येण्याचा मान मला मिळाला. अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त गोदावरी ते नर्मदा या यात्रेचाही शुभारंभ करण्यात आला. राज्यातल्या नद्या एकमेकांना जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचाही संकल्प आम्ही केला आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी त्या अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्या. अजित दादांच्या पश्चात अहिल्यादेवींचा जीवनपट हा माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभ असेल, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
राम शिंद यांची प्रतिक्रिया
चौंडीच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर झाला असून लवकरच विविध विकासकामांचं भूमीपूजन होणार असल्याचं विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. “1992 साली जयंती उत्सवाला अल्प प्रतिसाद मिळत होता, मात्र आता हा उत्सव राज्यस्तरीय झाला आहे,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या घोषणाबाजी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. “चौंडी हे पुण्यभूमी आणि प्रेरणास्थळ असून इथं राजकारण किंवा वादासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी यावं. मनात हेतू, किंतु-परंतु ठेवून जयंती सोहळ्यात सहभागी होणं योग्य नाही. जयंतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अनुचित वर्तन टाळावं वर्षातील उर्वरित 364 दिवस राजकीय भूमिका मांडण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र जयंतीचा दिवस समाजाला प्रेरणा देणारा आहे. चौंडीत प्रत्येकाने नतमस्तक होण्याच्या भावनेनं यावं आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा आदर राखावा,” असं आवाहन त्यांनी केलं.