
राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर अजित पवारांनी खास लक्ष केंद्रात केले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीनंतर आता लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर आता अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती मधील राष्ट्रवादी काँग्रेस कसबा भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. बारामतीमध्ये जिल्हा परिषदेसाठी सहा गट तर पंचायत समितीसाठी 12 गण आहेत. इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. अजित पवार हे स्वतः उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याने राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीची महायुती आहे. मात्र आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत हे पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपनेही पुणे जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. पुण्यात काल महत्त्वाची बैठकही पार पडली. यावेळी भाजप ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युती होण्याची शक्यता कमी आहे.