मोठी बातमी ! अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

Ajit Pawar Convoy Vehicle Accident : बीड जिल्ह्यात तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवाड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोठी बातमी ! अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी
Ajit Pawar Convoy vehicle accident
| Updated on: Nov 22, 2025 | 4:28 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवाड येथे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याचे समाोर आले आहे. या अपघातात दुचाकीवरील विष्णू दामोदर सुदे, त्यांची पत्नी आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर चारचाकी वाहन पलटी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांचा ताफा तेलगावहून केजकडे जात होता. यावेळी धुनकवड फाट्याजवळ अजित पवार यांच्या ताफ्यातील MH 02 GH 5732 या वाहनाचे एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुचाकीचा चुराडा

या अपघातानंतर जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने सर्वांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे. तसेच ताफ्यातील वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अजित पवारांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल होणार

या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे. आता पोलीसांनी या ताफ्यातील वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.