अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल कधी येणार? केंद्र सरकारने सांगितली तारीख
Ajit Pawar Plane Crash Report : अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. अशातच आता लवकरच या अपघाताचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित दादांसह दोन पायलट, एक सुरक्षा रक्षक आणि एका फ्लाईट एअर होस्टेसचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. या अपघाताबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. अनेकांनी घातापाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष या अपघाताबाबतच्या अहवालाकडे लागले आहे. या अहवालातून अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचे कारण समोर येणार आहे. आता केंद्र सरकारने या अपघाताचा अहवाल कधी समोर याची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विमान अपघातावर अनेकांना शंका
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. ‘कोण काय म्हणत यात जायचं नाही. आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपासाबद्दल माहित देत आहे.’
विमान अपघाताचा अहवाल कधी येणार?
पुढे बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावरही मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
28 जानेवारीला अपघात
दरम्यान, 28 जानेवारीला सकाळी अजित पवार मुंबईवरून बारामतीच्या दिशेने जात होते. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले होते. मात्र पहिल्या प्रयत्नात ते धावपट्टीवर उतरू शकले नाही. त्यामुळे पायलटने दुसरा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नादरम्यान हे विमान धावपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर कोसळले. यात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता. आता अहवाल समोर आल्यानंतर या अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.
