
Amit Thackeray : मुंबईतील सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडवर सुरू झालेल्या एका अनोख्या प्रकल्पाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या रोडवरून वाहन जातात ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकायला येत आहे. म्हणूनच आता कोस्टल रोड आता भारतातील पहिला म्युझिकल रोड म्हणून नावारुपाला आला आहे. दरम्यान, म्युझिकल रोड या प्रयोगाची सुरुवात होताच त्याचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर राजकीय नेत्यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीदेखील म्युझिकल रोड प्रकल्पावर आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलं आहे. मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? या प्रयोगासाठी मराठमोळं गाणं का निवडलं नाही? असे रोखठोक प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारले आहेत.
अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड या प्रकल्पावर सडकून टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा ‘म्युझिकल रोड’चा प्रयोग नक्कीच नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे, असं म्हणत त्यांनी तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. परंतु मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का? ही मुंबईकरांची ‘बेसिक’ मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.
खरंतर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्रॅफिकच्या गोंगाटातून जरा शांतता! काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ ‘गोंगाट’ ठरणार नाही का? तसेच, गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? असा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. काही वाजवायचंच होतं, तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? असा सवाल करत आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अतिउत्तम झालं असतं, अशी अपेक्षाही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे! मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता, तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अधिक अभिमानाचा ठरला असता. पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलो, असी खंतही त्यांनी बोलून दाखवली. महत्त्वाचा प्रश्न हा की, या गोष्टी नेहमी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’लाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते? असा थेट स्वाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत; पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल, तर तो विकास अपूर्ण आहे. त्यामुळे प्रयोग जरूर करा, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचं भान नक्की राखा, असा सल्लाही अमित ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.