‘मुख्यमंत्री अस्वस्थ’, अमोल मिटकरी यांचं शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठं विधान

| Updated on: Nov 30, 2022 | 8:47 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठं विधान केलंय.

मुख्यमंत्री अस्वस्थ, अमोल मिटकरी यांचं शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठं विधान
अमोल मिटकरी
Follow us on

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल मोठं विधान केलंय. “शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही”, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. “या सरकारवर आजच निर्णय होणार होता, मात्र न्यायमूर्ती रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार नवस करत फिरत आहेत. त्यामुळेच ते कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेलेत”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

“शिंदे गटाचे सगळे आमदार डिसक्वालीफाईड होतील, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. या 40 आमदारांचा भारतीय जनता पार्टीने राजकीय बळी घेतला आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

‘मुख्यमंत्री जादुटोणा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात’

हे सुद्धा वाचा

“ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करून जनप्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जादुटोणा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात हे काही फार चांगलं नाही. यासाठीच आज गाडगे बाबांच्या या भूमित येऊन हे सरकार गेलं पाहीजे आणि जनतेला अपेक्षित असलेल महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं पाहीजे एवढीच विनंती करतोय”, असंदेखील ते म्हणाले.

‘सरकार कोसळणार’

“न्यायालयाचा निर्णय लवकर आला तर सगळे आमदार अपात्र होतील आणि हे सरकार कोसळणार. राज्यपालांची हकालपट्टी होणार. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार आणि सर्व पक्ष ताकदीने एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील”, असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं.

अमोल मिटकरी यांचा राज्यपालांवर निशाणा

“महाराष्ट्रात आज भारतीय जनता पक्षाकडून सोयीचे राजकारण सुरू आहे. रोजगार, शेती आणि उद्योगांच्या प्रश्नांवरून नागरिकांच लक्ष विचलीत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केलं आणि त्यांना भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीने साथ दिली, हे दोघेही अतिशय उर्मट असून त्यांनी केलेले वक्तव्य हे वेदनादायक आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

“या संपूर्ण विषयावर शेवटी उद्विग्न होऊन छत्रपती उदयनराजेंनी भाजपला जाब विचारण्याचा एक प्रयत्न केला. वास्तविकतेमध्ये या संपूर्ण विधानांचं मूक समर्थन देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने केलं आहे. या लोकांनी राज्यपालांचा साधा निषेधही केला नाही, याचीच खंत छत्रपती उदयनराजेंच्या मनात होती ती त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून व्यक्त केली”, असा दावा त्यांनी केला.