भररस्त्यात गाठलं, नाव विचारलं अन् मग…; महादेव मुंडेंच्या मुलांवर कोणी केला हल्ला? नेमकं काय घडलं?
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हल्ल्यामागे वाल्मिक कराडच्या मुलांचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होत असून, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येचा तपास अद्याप सुरु आहे. त्यातच आता महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांवर भररस्त्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुख्यात वाल्मिक कराडच्या मुलांपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाला जिवाचा धोका असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला महादेव मुंडे यांची दोन मुले प्रणव आणि प्रवीण मुंडे हे आपल्या मित्राकडून परीक्षेसाठी वही आणण्यासाठी स्कुटीवरून सोमेश्वर नगर भागातून जात होते. यावेळी बालाजी आघाव नावाच्या तरुणाने त्या दोघांना मध्येच अडवले.
यावेळी मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ट्युशनला जाताना त्याने आम्हाला पाहिले होते. परत येताना त्याने आम्हाला थांबवून नाव विचारले. तू कुणाचा मुलगा आहेस? अशी विचारणा केली. जेव्हा मी सांगितले की मी महादेव मुंडे यांचा मुलगा आहे, तेव्हा त्याने थेट माझ्या भावाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याने आमच्या हातातील कडेही काढून घेतले. यावेळी तिथे काही नागरिक उपस्थित होते, पण कोणीही मदतीला आले नाही.
वाल्मिक कराड कनेक्शन आणि सोशल मीडियाचा पुरावा
या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय मुंडे कुटुंबाने व्यक्त केला आहे. यावेळी मुलांनी संशयित आरोपी बालाजी आघाव याचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले असता, त्यामध्ये वाल्मिक कराड याचे अनेक फॉलोअर्स आणि त्याच्या मुलांचे सुशील व श्रीगणेश कराड याचे फोटो दिसून आले. यामुळे हा हल्ला केवळ योगायोग नसून जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांच्या मुलांनी केला आहे. त्याला कोणी पाठवले होते आणि कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुलांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दरम्यान महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची मुले सुशील कराड व श्रीगणेश कराड यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, सतीश फड आणि वडील भगवान फड यांच्यावर हल्ला होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही दुखापत झाली किंवा अनपेक्षित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे सुशील आणि श्रीगणेश कराड जबाबदार असतील, असे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.
नार्को टेस्ट आणि तपासाचा रोख
काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोन संशयितांची नार्को टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमुळे तपासाची सुई कराड टोळीकडे वळत असतानाच हा हल्ला झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि मुंडे कुटुंबाला सुरक्षा देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
