Aurangabad | गुप्तधनासाठी इंजिनिअरने दिले 55 हजार, प्रयोग फसल्यावर ज्योतिषाचंच अपहरण, औरंगाबादेत काय घडलं?
जवाहर नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून गुप्त धनाच्या लालसेपोटी शिवाजी नवाते यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.
![Aurangabad | गुप्तधनासाठी इंजिनिअरने दिले 55 हजार, प्रयोग फसल्यावर ज्योतिषाचंच अपहरण, औरंगाबादेत काय घडलं? Aurangabad | गुप्तधनासाठी इंजिनिअरने दिले 55 हजार, प्रयोग फसल्यावर ज्योतिषाचंच अपहरण, औरंगाबादेत काय घडलं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/02150935/New-Project-2022-06-02T093922.071.jpg?w=1280)
औरंगाबादः शिकल्या सवरलेल्यांनी तरी गुप्तधनासारख्या (secret money) गोष्टींवर विश्वास ठेवू नये, अशी अपेक्षा असते. मात्र औरंगाबादेत (Aurangabad) चक्क एक सिव्हिल इंजिनिअरच गुप्तधन मिळवून देतो, असं सांगणाऱ्या भोंदूच्या जाळ्यात अडकला. मग काय…. त्याला पैसे दिले. एक ते दोन ठिकाणी गुप्तधन शोधलं गेलं. पण हाती काहीच लागत नसल्याचं पाहून इंजिनिअरचाही (Engineer) संताप अनावर झाला. त्यानंतर तीन साथीदारांच्या मदतीने चक्क ज्योतिषाचं अपहरण केलं. ही घटना समजल्यानंतर गुन्हे शाखेनं तिन्ही आरोपींना पकडलं. अपहरण केलेल्या ज्योतिषाची सुटका केली. पडेगाव परिसरात 31 मे रोजी या ज्योतिषाचं अपहरण झालं. त्यानंतर सदर प्रकरणातील घडामोडी समोर आल्या.
काय घडली घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल इंजिनिअर शिवाजी किसन नवाते, मच्छिंद्र रामकिसन आगलावे, रवी सुंदरलाल हनुते अशी आरोपींची नावं आहेत. शिवाजीनगरमधील वैभव एकनाथ लहाने याने यासंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार, किशोर कांतीलाल कोंडेकर (गारखेडा) हे ज्योतिष शास्त्र बघून आयुर्केविदक औषधी देतात. आठ महिन्यांपूर्वी फिर्यादी आणि कोंडेकर यांची ओळख झाली. सहा महिन्यांपूर्वी कोंडेकर यांनी आय़ुर्वेदिक औषधींसाठी शिवाजी नवाते याच्याकडून 55 हजार रुपये घेतले होते. ते पैसे वैभवनेच मोजले होते.. पण 31 मे रोजी कोंडेकर यांनी वैभवला फोन करून दोन व्यक्ती औषधी घेण्यासाठी येणार असल्याचे सांगून बोलावून घेतले. सकाळी मच्छिंद्र व त्याचे साथीदार कोंडेकर यांना भेटण्यासाठी आले. तेथे नवाते, त्याच्यासोबत आलेल्या दोघांनी कोंडेकर व वैभव यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एका दुचाकीवर कोंडेकर तर दुसऱ्या दुचाकीवरून वैभवचे अपहरण करून हर्सूल स्मशानभूमीकडे नेले.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/26163454/New-Project-2022-05-26T110439.232.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/26150432/New-Project-2022-05-26T093424.796.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/26012444/Auragabad-Jalna-Accident.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/25233851/WhatsApp-Image-2022-05-25-at-5.59.09-PM.jpeg)
पोलिसांपर्यंत अशी गेली तक्रार
आरोपींनी कोंडेकर याच्या फोनवरून वैभवच्या आईला फोन लावून 55 हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली. तेव्हा आईने उलट आरोपींविरोधातच पोलिसात जाण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी वैभवला सोडून दिलं. कोंडेकरला मच्छिंद्रने मिटमटा परिसरात नेलं. दरम्यान वैभवने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे ज्योतिषाचे लोकेशन काढले. पडेगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातून पोलिसांनी कोंडेकर यांची सुटका केली. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. जवाहर नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून गुप्त धनाच्या लालसेपोटी शिवाजी नवाते यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.