जिल्हा परिषदेसाठी निधी कमी पडू देणार नाही, पण हिशोब हवा; मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना घातल्या तीन अटी

| Updated on: Sep 17, 2021 | 11:10 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात संबोधित करताना त्यांनी ही ग्वाही दिली. (cm uddhav thackeray)

जिल्हा परिषदेसाठी निधी कमी पडू देणार नाही, पण हिशोब हवा; मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना घातल्या तीन अटी
cm uddhav thackeray
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या इमारतीसाठी एक पैसा कमी पडू देणार नाही. हवं तर आणखी 20 कोटी रुपये देईन. पण प्रत्येक पैशाचा हिशोब हवा, असं सांगतनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना तीन अटी घातल्या. (cm uddhav thackeray addresses in Ceremony of Laying the Foundation Stone of zilla parishad building)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात संबोधित करताना त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी मंचावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, उदय सामंत, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते. 45 वर्षात इमारतीचं दुसऱ्यांदा उद्घाटन असा प्रकार आता होणार नाही, अब्दुलजी आणखी 20 कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय, जे करायचं ते सरळ करेन, मला इकडे ही इमारत उभे राहिलेले पाहिजे म्हणजे पाहिजेच. दया माया चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या तीन अटी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्यासाठी तीन अटीही घातल्या. इमारतीच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. काम झाल्यानंतर कारभाराचा दर्जा सुद्धा उत्तम असला पाहिजे ही माझी अट आहे. तेसच ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे ही माझी तिसरी अट आहे.आणि हे जर मान्य असेल तर मी पैसा कमी पडू देणार नाही. पण मला तारखा द्याव्या लागतील. तारखेवर कामे पूर्ण झाली तर पैसे मिळतील, असंही त्यांनी सांगितलं.

इमारतीत काय असावं

जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही. क्लायमेट चेंज झालंय हे दुर्भाग्य आहे आपलं. अतिवृष्टी सुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य जपलं पाहिजे. मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे. जनता बघायला पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे, मी मुंबईत एक वार्ड ऑफिसचं उद्घाटन केलं. ते मला आवडलं कारण तिथे व्यायाम करण्यासाठी जिम बनवली आहे. इथे सुद्धा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने तर्कवितर्क

मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, अशी भाषणाची सुरुवात करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं. मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करून आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला? असा सवाल करतानाच अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठिशी राहतो. आम्हाला प्रेझेंटेशनची गरज नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. (cm uddhav thackeray addresses in Ceremony of Laying the Foundation Stone of zilla parishad building)

 

संबंधित बातम्या:

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!

LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात पहावं लागेल, राऊतांचा चिमटा घेत मोदींचं तोंडभरू स्तुती

(cm uddhav thackeray addresses in Ceremony of Laying the Foundation Stone of zilla parishad building)