Weather Update: पुढचे पाचही दिवस महत्त्वाचे, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

| Updated on: Sep 23, 2021 | 2:15 PM

शुक्रवार, शनिवार, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

Weather Update: पुढचे पाचही दिवस महत्त्वाचे, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
पुढील पाच दिवसातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज
Follow us on

औरंगाबाद: शहर आणि ग्रामीण भागात तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु (Heavy Rain in Aurangabad) आहे. यामुळे औरंगाबादसह, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूरातील धरणं ओव्हरफ्लो होत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचेही नुकसान झाले आहे. मात्र सप्टेंबर महिन्यातील पावसानं या परिसरातील लाभ क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान येत्या पाच दिवसातही मराठवाड्यातील (Rain Forecast in Marathwada) काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये 27 सप्टेंबरला मुसळधार

औरंगाबाद जिल्ह्यातही पुढील पाच दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा पाऊस?

दिनांक 23 सप्टेंबरः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 24 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 25 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 26 सप्टेंबर: जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 27 सप्टेंबर: औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे,

ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के, डाखोरे यांनी दिली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून सर्वात मोठे असलेले जायकवाडी धरणही 75 टक्के भरले आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांतील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळला तर ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

इतर बातम्या-

Weather Forecast: महाराष्ट्रात संततधार सुरुच राहणार, उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट

Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी