मनोज जरांगे आंदोलनावर ठाम की बॅकफूटवर येणार? शिंदेंचा खास माणूस भेटीला; अंतरवलीत आज काय घडणार?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आज अंतरवलीत त्यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि इतर मागण्यांवर चर्चा होणार असून, जरांगे आंदोलनावर ठाम राहतात की माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 तारखेपासून आंदोलनाचं हत्यार उपसणार आहेत. मुंबईतच हे आंदोलन करण्याचा जरांगे यांचा इरादा आहे. त्यासाठी जरांगे यांनी महाराष्ट्रात दौरे काढून मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जरांगे यांचं हे निर्णायक आंदोलन असणार आहे. या आंदोलनाचं काउंटडाऊन सुरू झालेलं असतानाच एकनाथ शिंदे यांचा खंदा सहकारी आज मनोज जरांगे पाटील यांना अंतरवलीत जाऊन भेटणार आहे. त्यामुळे अंतरवलीत आज काय घडणार? जरांगे आंदोलनावर ठाम राहणार की बॅकफूटवर येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हे आज मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात भेट घेणार आहे. सत्तार हे सिल्लोडवरून अंतरवली सराटीच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी सत्तार हे जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांच्या इतर मागण्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच हे आंदोलन पुढे ढकलण्याबाबतची विनंतीही सत्तार यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.
शिंदेवरील टीकेवर चर्चा?
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मराठा विरोधी लोकांच्या बैठका होत असून या लोकांना शिंदे गटाची फूस आहे. शिंदे हे आमच्यासोबत डबल ढोलकी वागत असून येत्या निवडणुकीत आम्ही त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. जरांगे यांनी वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही जरांगे यांची शिंदेंवरील टीका सुरूच आहे. त्यामुळे सत्तार हे शिंदेंची बाजू जरांगे यांच्याकडे मांडण्याची शक्यता आहे. या भेटीत शिंदेंवर होत असलेल्या आरोपांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व आलं आहे.
वर्षा निवासस्थानावर आंदोलन?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत आंदोलन करणार की अंतरवलीत आंदोलन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र न देण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे करण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले होते. पण जरांगे आपल्या आरोपावर ठाम आहेत. त्यामुळे जरांगे आणि सरकार यांच्यात तणातणी सुरू झाली आहे.