Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले
"सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे" असं बच्चू कडू म्हणाले.

दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यांची दहशतवाद्यांसोबत तुलना केली. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी केली. सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना केली, त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य फार चुकीचं आहे. आपण आपल्याच देशातल्या लोकांना आतंकवादी ठरवत असू तर त्याचे देशभरात चांगले परिणाम होणार नाहीत. वाईट परिणाम दिसतील. सदाभाऊ खोत यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले.
“आंदोलन मुद्यावर होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. राजीनाम्यापेक्षा जर या सगळ्या परीक्षा अजून मजबूतीने होण्यासाठी मागणी केली असती, समितीला न्यायालयीन दर्जा कसा मिळेल. विद्यार्थ्यांच्या या मागच्या भूमिका काय आहेत. आजच्या तरुणांकडे नोकरीशिवाय काही पर्याय आहेत का? शेती नुकसानीत आहे, उद्योगाची समस्या आहे” असं बच्चू कडू म्हणाले.
कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती
“सदाभाऊ खोत जे बोलले, त्याचा निषेध करतो. पण राजीनाम्यापेक्षा मागणीला दुसरी बाजू दिली असती तर त्याचं महत्व वाढलं असतं. दर्जा प्राप्त झाला असता. कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती. राजीनामा देऊन कायम स्वरुपी व्यवस्था होणार आहे का?. आज दुसरामंत्री येईल, उद्या तिसरा मंत्री येईल. राजीनामा घेतला तर त्याशिवाय हाती काय भेटणार आहे” असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.
हे माझं व्यक्तिगत मत आहे
“सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे. आंदोलन या देशाचा आत्मा आहे. आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आंदोलनकरी दोषी नसतात. त्यांनी दृष्टीकोन बदलला पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले. दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं.
