महाविकास आघाडीत फूट? ठाकरे गटात दोन मतप्रवाह, राजकारणात खळबळ

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरून ठाकरे सेनेत दोन गट पडले असून, राहुरीच्या जागेवरूनही मोठा पेच निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीत फूट? ठाकरे गटात दोन मतप्रवाह, राजकारणात खळबळ
uddhav thackeray
| Updated on: Apr 05, 2026 | 11:41 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. आता या पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दोन स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. आता याबद्दल उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटात दोन मतप्रवाह का?

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीच्या विषयावरून नेत्यांमध्ये खडाजंगी निर्माण झाली. ठाकरेंच्या एक गटानुसार, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. तसेच अजित पवारांचे उद्धव ठाकरेंसोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणे हीच योग्य श्रद्धांजली ठरेल, असे या गटाचे म्हणणे आहे.

तर दुसऱ्या गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुनेत्रा पवार या महायुतीकडून लढत असताना आपण त्यांना पाठिंबा का द्यावा? जर आपण इथे माघार घेतली, तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती या गटाकडून व्यक्त केली जात आहे.

त्यासोबतच जर राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवार गटाने किंवा महाविकास आघाडीतील इतर कोणीही आपला उमेदवार दिला नाही, तर शिवसेना ठाकरे गटाने तिथे आपला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव ठाकरे सेनेतील एका गटाने मांडला आहे. दरम्यान एकूणच बारामती आणि राहुरी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत एक वाक्यता दिसत नसल्याचे बोललं जात आहे. काँग्रेसने आधीच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असताना, ठाकरे सेनेतील या अंतर्गत वादामुळे आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय राऊत यांची भूमिका

या वादावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीत चर्चा सुरू असून आघाडी एकसंध आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या पक्षाच्या आहेत, त्यामुळे अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. राहुरीसाठी आमच्या पक्षातून ३ जण इच्छुक आहेत, पण मविआ म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. बारामतीबाबत सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे, मात्र उद्धवजींनी बिनविरोध निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही जाहीर भूमिका मांडलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांच्या निधनाबद्दल आदर आणि सहानुभूती आहेच, पण म्हणून निवडणुका लढवायच्या नाहीत हा अट्टाहास चुकीचा आहे. जे लोक सरकारवर नाराज आहेत, त्यांच्यासाठी बिनविरोध निवडणूक हा अन्याय ठरेल. निवडणुकीत मतदारांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो, असेही संजय राऊतांनी नमूद केले.

Follow Us