संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही, कारवाई नक्की होणार, देवेंद्र फडणवीसांनी बीडच्या जनतेला दिला विश्वास
बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी जाहीर भाषणादरम्यान त्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला.
बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी आज देवेंद्र फडणवीसांनी केली. यावेळी बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई होणार, असे जाहीरपणे सांगितले.
“संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. माझी बीडच्या जनतेला विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींनी एकत्र करुन स्वराज्याचा स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सर्वांना एकत्र नांदायचे आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करु, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बीडचा जो इतिहास सुरेश धस किंवा पंकजा मुंडेंनी सांगितला इतकी मोठी लोक आपल्याला बीडने दिली आहेत. तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली बीडचा इतिहास तयार करण्यासाठी आपल्या सर्वांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहिन, इतकंच या निमित्ताने सांगतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.