मनोज जरांगे पाटील यांची आज बीडच्या नारायण गडावर बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी नारायण गडावर 8 जूनला भव्य सभा होणार असल्याची माहिती दिली. तसेच या सभेत 6 कोटी मराठे एकत्र येणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सरकारला सगेसोयरीची अधिसूचना जारी करण्याचं आवाहन केलं. “मी स्वार्थी नव्हतो, नाहीतर मी या मराठ्यांच्या लाटेत निवडून दिल्लीला गेलो असतो. निवडणुकीत आमच्या गाडीला कोणीही स्टीकर लावू नका, आणि कोणी लावूनही घेऊ नये. आपलं वाईट झालं तरीही तुम्हाला राग चीड का येत नाही? सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे? जात जगविली नाही तर भविष्यात कोणीही जिवंत राहणार नाही. आपली आज जात एकत्र आल्याने अनेक लोक जळत आहेत. मला काहीही देऊ शकतील. मला पद देऊन कोट्यवधी रुपये मिळाले असते. मला राज्यातून तडीपार केल्यास मी इतर राज्यात जाईन, तिथं आंदोलन करेन. जेलमध्ये टाकले तर मी कैद्यांना घेऊन आंदोलन करेन. मी शिव्या घातल्या म्हणून एसआयटी नेमली. तुम्ही आमच्या आई-बहिणीला मारले, ते काहीच नाही का?”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“माझ्या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीला 15 लाख रुपये देऊन आमिष देण्यात येत आहे. असे असेल तर दोन तासात मराठे 5 हजार कोटी जमा करतील”, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “आम्हाला आरक्षण द्या. एसआयटी कसली आहे, मला माहीत नाही. मी दीड महिन्यांपासून वाट पाहतोय. ती काही येईना. नारायण गडावरून सर्व जाती धर्मांना माझे आवाहन आहे. देणारे बना… बीडमध्ये एसपी यांनी जेसीबीवर गुन्हा दाखल केले. बीडचे एसपी कोतवालाचे काम करत आहेत. माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करण्याची शक्यता आहे. मला खेटायचे असेल तर कायद्याने खेटा”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“मी राज्यात एकही उमेदवार दिला नाही. लोक मनाने काहीही बोलत आहेत. कोणीही या आंदोलनाचा फायदा घेऊ नका. माझे फोटो कोणत्याही पक्षाने लावू नये. सरकारने आपली फसवणूक केली आहे. आपली एकही मागणी पूर्ण नाही. खोटे गुन्हे दाखल करणे थांबवा फडणवीस साहेब. 200 मीटरला पिण्याचे पाणी असेल. साधारण 3 हजार एकरवर ही सभा असेल. सभास्थळी 400 बेडचे सुसज्ज रुग्णालय. सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढील विधानसभा निवडणूक ठोकलीच समजा. पाच-पाच हजार फॉर्म भरल्यावर तुम्हाला कोणते चिन्ह द्यायचे? मी एक अर्ज म्हटल्यावर सर्व जण कोमात गेले. एकही मराठ्याने कुठल्याही सभेला जाऊ नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
“बांधवांनो दारू सोडा, आपली जात आणखीन सुधारेल. निर्व्यसनी व्हा. लिंगायत समाज मतदानात चार नंबरला आहेत. 100 टक्के मतदान करण्यासाठी मराठे मोठ्या संख्येने बाहेर पडा. 92 मतदारसंघात मराठ्यांचा प्रभाव आहे. इतर समाज आणखीन सोबत आला तर 160 जागा आपल्याच. मग आम्हीही ED दाखवू”, असं जरांगे म्हणाले.
“8 जूनला नारायण गडावर सर्वात मोठी सभा आहे. पाच हजार लिटरचे 1000 टँकर तयार ठेवा. या पृथ्वीतलावर झाली नसेल अशी सभा घ्यायची आहे. 2000 हजार एलसीडी लागतील. 10 हजार फोकस लागतील. 1 लाख स्वयंसेवक लागतील. सभेला लागणारा निधी फक्त मराठा समाजाकडूनच घ्या. इतर समाजाकडून एकही रुपया घेऊ नका. सभेला 6 कोटी समाज येईल. 8 जूनला लग्नाची तारीख काढू नका. सभेआधी डिझेल भाव वाढवू शकतात. डिझेल आताच भरून ठेवा. माझ्याकडे आठआने देखील नाहीत. माझं पॉकेट मारलं. त्यात काहीही नव्हते. चोर दोन दिवस जेवला नसावा. मुख्यमंत्री, गृहमंत्री… तुम्हाला शेवटची विनंती आहे. सगेसोयरे अंमलबजावणी करा”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.