सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर उदय सामंत, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. दरम्यान त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. शपथविधी लवकर कोणी करायला लावला? असं लोक विचारत आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे दु:खद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं, हे लोकांना आवडलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच लोकभावना मांडली, कोणाचा गैरसमज झाला असेल तर देणंघेणं नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत ?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होणं यामध्ये कोणाला वाईट वाटलं, असं अजिबात नाही. पण हे इतक्या लवकर का झालं? कोणी करायला लावलं का? मगे हे कोणी घडवून आणत आहे का? अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत. पण तुम्ही जर सोशल मीडियावर गेलात, किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघताना जर तुम्ही खाली येणाऱ्या कमेंट वाचल्या तर या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शंका आहेत, त्याच्यामध्ये कोणी काय म्हटलं, त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. परंतु सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, याचं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मनापासून समाधान आहे. सुनेत्रा पवार या अजित पवारांचा वारसा नक्की पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांनी काय म्हटलं?
दु:खद घटना घडल्यानंतर इतक्या लवकर शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसांना पटलेलं नाहीये. म्हणून मी त्यावेळेला माझी भावना व्यक्त केली. त्यामुळे जर कोणाचा काही गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
