एकनाथ खडसेंचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवले: जयंत पाटील
2019 च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. | Jayant Patil
जळगाव: एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसे साहेबांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की काय अशी शंका उत्पन्न होत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. (NCP leader Jayant Patil take a dig at BJP in Jalgaon)
ते गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 2019 च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीची सत्ता येईल, मी जलसंपदा मंत्री होईल याची कल्पना देखील नव्हती, मात्र योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे साहेबांच्या हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचे उद्घाटन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेबांनी पाडळसरे धरणाचे भूमीपूजन केले होते. खडसे साहेबांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही अशी भूमिका भाजपची आहे की काय अशी शंका येते. म्हणूनच गेली पाच वर्षे या धरणाचे काम केले गेले नाही. @EknathGKhadse @MLA_AnilPatil pic.twitter.com/BLlUDP4tuv
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 11, 2021
जळगावमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करणार: खडसे
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे, असा आत्मविश्वास एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा, इथे जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे
शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे
(NCP leader Jayant Patil take a dig at BJP in Jalgaon)