एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; नाथाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवला, पहिली प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडक्यात साजरा झाला. विरोधी पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, त्यावर आता खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. परंतु निमंत्रण असून देखील भाजप नेत्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. भाजप नेते या कार्यक्रमाला अनुउपस्थित असल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. यावर आता एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भाजप नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
अलीकडे भाजपमध्ये 80 टक्के लोक हे भाजपचे राहिलेच नाहीत, काँग्रेस किंवा इतर काँग्रेस यासह इतर पक्षांमधून अनेक जण भाजपामध्ये आलेले आहेत, त्यांना जुन्या कार्यकर्त्यांची काय मेहनत आहे हे माहिती नाही. भाजप ही काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही, असं यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप केले, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आज मुख्यमंत्र्यांच्या साथीने बसलेले आहेत. त्यामुळे अशांकडून फार अपेक्षा नव्हती. मात्र काही व्यक्तींकडून माझी अपेक्षा होती, की त्यांनी कार्यक्रमाला यायला हवं होतं. चाळीस पंचेचाळीस वर्ष मी भाजपमध्ये मेहनत केली आहे.
कुठे कार्यक्रम असो सारे भेदभाव विसरून आपण कार्यक्रमाला येतो, मात्र त्यांचं येणं न येणं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. मात्र ते येऊ शकले नाही याचं मला दुःख आहे. मात्र भाजपचे नेते, आमदार, खासदार न येता माझ्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. परंतु भाजपचे चंद्रकांत पाटील, खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार संजय कुटे, शिवसेनेचे प्रतापराव जाधव भेटीसाठी येऊन गेले, अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी दूरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क साधून मला शुभेच्छा दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना नाथाभाऊ नको असं नाही, काही विशिष्ट लोकांना नाथाभाऊ नको म्हणून हा प्रकार घडला असावा. मात्र आज माझा वाढदिवस असल्यामुळे मी टीकाटिपणी करणार नाही, असं यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू असे जरांगे यांनी सांगितले आहे. त्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात त्यांचे सरकारसोबत बोलणं सुरू आहे. त्याच्यातून काही मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे, असंही यावेळी खडसे म्हणाले.