
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत गोटात उमटू लागले आहेत. यामुळे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावरून नरहरी झिरवळ यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांना कडक शब्दात समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मंत्र्यांकडे असलेल्या एका अपील अर्जावर सकारात्मक निकाल देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. एसीबीने केलेल्या कारवाईत ढेरिंगेच्या कार्यालयातून ४२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर त्याच्या नाशिकमधील घरावरही छापे टाकून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या घटनेमुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.
या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ काही काळ नॉट रिचेबल होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात नरहरी झिरवळ यांना काही सल्ले दिले आहेत.
स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही याची सर्वस्वी काळजी घ्या. प्रशासन आणि अधिकारी तुमच्या कारभारामुळे बदनाम होणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशा कडक शब्दात सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना समज दिली. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मुद्द्यावरून झिरवळ यांना धारेवर धरल्याचे समजते.
लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला, ही माझीही जबाबदारी आहे. या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जर या धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देईन.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर आता नरहरी झिरवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत ते आपली बाजू मांडतील असे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.