8 वर्षांपासून छळ, स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, तलाकबद्दल बोलताच… कल्याणमधील तरुणीसोबत काय घडलं?
कल्याण वालधुनी परिसरात सराईत गुन्हेगार पतीकडून पत्नी व मेहुण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील वालधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. कौटुंबिक छळाचा कळस गाठत एका सराईत गुन्हेगाराने गुन्हेगारीची हद्द पार केली आहे. आपल्या पत्नीवर आणि तिचा जीव वाचवायला आलेल्या मेहुण्यावर थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच जीवघेणा हल्ला केला. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याणच्या अशोक नगर परिसरात राहणाऱ्या रुक्सारचा विवाह ८ वर्षांपूर्वी तन्वीर फरीद खानशी झाला होता. मात्र, सुरुवातीपासूनच तिला हुंडा आणि इतर कारणांवरून त्रास दिला जात होता. पती तन्वीर, सासरा फरीद, दीर सद्दाम आणि नणंद शबाना यांनी रुक्सारचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून तिने पूर्वी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. यानंतर अखेर १२ एप्रिल २०२६ रोजी या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि तलाकच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंची बैठक बोलावण्यात आली. मात्र संवादाच्या नावाखाली झालेल्या या बैठकीत आरोपींनी रुक्सारला अमानुष मारहाण केली.
मारहाण सहन न झाल्याने रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम यांनी न्यायासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पण आरोपींनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. ते पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ पोहोचले असता आरोपींनी अचानक धारदार चाकू आणि दगडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या बहीण-भावांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे धाव घ्यावी लागली. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या आवारात शिरल्यानंतरही आरोपींचा माज कमी झाला नव्हता. ते पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यांचा पाठलाग करत आले होते.
अस्लमची प्रकृती चिंताजनक
या हल्ल्यात अस्लम आणि रुक्सार गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही तातडीने मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या शरीरावर ८ ते १० खोल जखमा झाल्या आहेत. त्यात अस्लमची प्रकृती चिंताजनक बनली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी तन्वीर खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला हद्दपारही करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तन्वीरला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या हल्यात सहभागी असलेले सासरा आणि दीर अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी भरदिवसा झालेला हा हल्ला कायद्याच्या भीतीचा अभाव दर्शवतो. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. फरार आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर मोक्का किंवा कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
