आधी शिवीगाळ केली, मग मित्रांना बोलवून घेराव घातला अन् मग… कल्याणमध्ये रात्री काय घडलं?
कल्याणजवळील बापगाव परिसरात जुन्या वादातून भूषण वाकडे या तरुणावर चोपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पीडित तरुणांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला.

कल्याणजवळील बापगाव परिसरात पूर्ववैमनस्यातून एका २५ वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भूषण दिलीप वाकडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. मात्र, या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तीन इतर आरोपींची नावे एफआयआरमधून (FIR) जाणीवपूर्वक वगळल्याचा गंभीर आरोप जखमी तरुणाने केला आहे. त्यामुळे त्याने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भूषण वाकडे हा बापगाव येथील स्वतःच्या आई एकविरा खानावळीबाहेर बसला होता. यावेळी जुन्या वादाची कुरापत काढून रोहित मुकुंद वाकडे आणि पुष्कर चैनू वाकडे यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर रोहितने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच सुमित वाकडे, जय वाकडे, रवींद्र वाकडे, किरण वाकडे यांच्यासह दयानंद वाकडे, दिनकर वाकडे आणि अमृत वाकडे तिथे पोहोचले.
यानंतर आरोपींनी भूषणला घेराव घालून घट्ट पकडून ठेवले, जेणेकरून त्याला पळता येऊ नये. याच संधीचा फायदा घेत रोहित वाकडे याने हातातील तीक्ष्ण चॉपरने भूषणच्या छातीवर वार करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात भूषण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी पडघा पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
मात्र, जखमी भूषण वाकडे याने पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मी दवाखान्यात उपचार घेत असताना आणि शुद्धीत नसताना पोलिसांनी माझा जबाब घेतला. प्रत्यक्षात दयानंद वाकडे, दिनकर दशरथ वाकडे आणि अमृत वाकडे यांनी मला पकडून ठेवले होते, ज्यामुळे माझ्यावर वार करणे सोपे झाले. परंतु, या तिघांची नावे जाणीवपूर्वक एफआयआरमधून वगळण्यात आली आहेत, असा आरोप भूषण वाकडे याने केला आहे.
यानंतर त्याने न्यायासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. त्याने आपला पुनर्जबाब नोंदवून घेण्याची आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच उर्वरित तीन आरोपींचा यात समावेश त्यांनाही या गुन्ह्यात तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्याने अर्जाद्वारे केली आहे.
पोलीस काय म्हणाले?
याबाबत पडघा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पीडिताने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात अन्य काही आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.