मनोज जरांगेंचा एक मोठा इशारा, काही मिनिटांत सूत्र हलली; पत्रकारो परिषदेतच थेट मंत्री सामंतांचा फोन
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला एक मोठा इशारा दिला. त्यानंतर काही मिनिटांत सूत्र हलली. त्यानंतर पत्रकार परिषदेतच थेट मंत्री सामंतांचा जरांगेंना फोन आला.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यास दिरंगाई होऊ लागल्याने सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत अनेक मराठा लोकप्रतिनिधी कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पदावरुन पायउतार झाले आहेत. तर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी जुनी नोंद उपलब्ध होईना झाली आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर मनोज जरांगेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारी मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेतच मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांना फोन लावला. या दोघांमंध्ये नेमकं काय संभाषण झालं, जाणून घेऊयात.
मनोज जरांगे यांना भर पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांचा फोन आला. मनोज जरांगे म्हणाले, आम्ही शिंदे साहेबांसाठी खस्ता खातो. त्यानंतर माझ्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी शिंदेंच्या एका आमदाराच्या कॉलेजवर बैठका होत आहे. मी या नेत्याचं नाव सांगणार नाही. तुम्ही शोधून घ्या. माझ्याविरोधात मोर्चा काढण्यासाठी बैठका सुरू आहे. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बैठका आहे. मराठा आंदोलनावर टीका करणारे तुमच्यासोबत बाळासाहेब भवनमध्ये काय करत आहे?’
उदय सामंत उत्तर देताना म्हटले की, ‘मी बघतो, आधी दाखले कसे रद्द होतात, म्हणून मी विधानही केलं आहे. मी आता फडणवीस दादांशी बोलून घेतो. विखे पाटलांशी देखील बोलून घेतो’. त्यानंतर सामंत म्हणाले, ‘मराठा समाजातील लोकप्रतिनिधींचं प्रमाणपत्र रद्द झालं, त्यामुळे महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला. खरंतर त्यांचं काही नाही. दोन दिवसांआधी जातपडताळणी काढण्यासाठी आदेश रद्द काढतात. त्यानतंर दुसऱ्या दिवशी जातप्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले जातात. हे सगळं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं. या प्रकरणामुळे मराठ्यांच्या नोंदी बोगस असल्याचा संदेश देतो’.
जरांगे पुढे म्हणाले, ‘मला शिंदे साहेबांकडून अपेक्षा नव्हती. मी भरपूर खस्त्या खाल्ल्या आहेत. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसी नेते बाळासाहेब भवनात काय करतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मी त्यांचे नाव घेत नाही. मी शिंदेंवर नाराज आहे. कारण नुकताच प्रवेश केलेल्या नेत्याच्या कॉलेजवर माझ्या विरोधात बैठका सुरू आहे. मी शिंदेंसाठी जिवाचं रान करत आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अशा बैठकी होऊ शकत नाही. ते कधीच असे आदेश देत नाही’. त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, ‘माझ्या मुलांचं वाटोळं करू नका. मी तुम्ही आणि शंभुराजे देसाई यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मानतो. मला 4 नेत्यांचे प्रमाणपत्र वैध करून द्यावे’. त्यानंतर सामंत म्हणाले, मला माहिती द्यावी. व्हाट्सअॅपवर माहिती द्यावी. मला 4 सर्टिफिकेट पाठवा. मी बावनकुळेंशी चर्चा करतो. मी संध्याकाळपर्यंत फोन करतो’.
