शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून

होळी आणि शिमग्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १८६ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई-सावंतवाडी आणि नागपूर मार्गावरील या गाड्यांचे बुकिंग १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आपले तिकीट आरक्षित करावे.

शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, होळीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या, बुकींग कधीपासून
| Updated on: Feb 18, 2026 | 2:45 PM

कोकणचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण म्हणजे होळी आणि शिमगा. या शिमगोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची दरवर्षी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित गाड्यांची तिकिटे फुल्ल झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. यंदाच्या उत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १८६ गाड्यांचे दोन मुख्य गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. यात होळी विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या केवळ होळीच्या सणांपुरत्या मर्यादित असतील. तर नियमित विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील गर्दी कमी करण्यासाठी नियोजित वेळापत्रकानुसार धावतील.

प्रमुख मार्ग कोणते?

कोकण मार्ग: मुंबई ते सावंतवाडी रोड (थेट सेवा).

विदर्भ मार्ग: मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर.

उत्तर भारत: मुंबई/पुणे येथून बनारस, गोरखपूर, समस्तीपूर आणि दानापूर या शहरांसाठी विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातील.

सावंतवाडी रोड विशेष गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आठवड्यातून दोनदा धावतील. या गाड्यांच्या निश्चित तारखा आणि वेळ रेल्वेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली अशा प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे स्थानकांवरील पीआरएस (PRS) केंद्रांवरून बुकिंग करता येईल. होळीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी पाहता, प्रवाशांनी १८ तारखेलाच आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.