Chandrakant Patil : एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आमच्या नेत्यांना, राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवर चंद्रकांत पाटलांची भूमिका
आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यावर नारायण राणे काय म्हणाले, ते पाहावे लागणार आहे. मात्र उत्तर, प्रतिक्रिया देण्याचा त्यांना अधिकार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूर : कोणाला काय उत्तर द्यायचे, याचे अधिकार आमच्या नेत्यांना आहेत. नारायण राणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी काय म्हणाले, ते पाहावे लागेल. मात्र आपले मत व्यक्त करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. एकूणच नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे चंद्रकांत पाटील यांनी समर्थनच केले आहे. शरद पवार आणि नारायण राणे (Narayan Rane) काय म्हणाले, मला माहीत नाही. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या शक्यता यावरून राजकारण तापले आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलत होते.
‘उत्तर देण्याचे अधिकार’
आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यावर नारायण राणे काय म्हणाले, ते पाहावे लागणार आहे. मात्र उत्तर, प्रतिक्रिया देण्याचा त्यांना अधिकार आहे, असे ते म्हणाले. तर राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ आहे. या घटनांचा भाजपाशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या काही घडामोडी आहेत, त्या टीव्हीवरच पाहायला मिळत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
काय म्हणाले होते नारायण राणे?
शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आहेत, त्यांना मुंबईत येऊ द्या. त्यातील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही बहुमत सिद्ध करणार, असा दावा काल शरद पवार यांनी केला होता. आमदारांना मुंबईत यावेच लागेल, असे विधान पवार यांनी केले होते. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते.