Malegaon Bomb Blast Case : आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना… देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काँग्रेसच्या यूपीए सरकारवर 'भगवा दहशतवाद'चा आरोप लावून लक्ष विचलित करण्याचा आरोप केला आहे.

मालेगावमधील भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून पुराव्यांच्या अभावी सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ आरोपींचा समावेश होता. याप्रकरणी न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी आपली मते व्यक्त केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर सरकारने त्यावेळी योग्य पुरावे दिले असते, तर गुन्हेगार सुटले नसते”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“जेव्हा हा खटला दाखल झाला, तेव्हा अनेक नेत्यांनी काही निरपराध लोकांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच, या खटल्यात राजकारण होत आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती. आज जेव्हा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तेव्हा त्यावेळच्या शंकांमध्ये तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. जर सरकारने त्यावेळी योग्य पुरावे दिले असते, तर गुन्हेगार सुटले नसते. या निर्दोष मुक्ततेमुळे तेव्हाच्या शंका खऱ्या ठरल्या आहेत”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या निर्दोष मुक्ततेला काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली चपराक असे म्हटले आहे. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा कट रचला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. त्यांच्या मते, हा हिंदू समाजाची बदनामी करण्याचा व्यापक कट होता. यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तेव्हा राज्य आणि केंद्र दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकार होते आणि त्यांनी खोटे पुरावे रचले. त्यामुळे काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी निर्दोष मुक्ततेच्या निकालावर वेगळ्या पद्धतीने भाष्य केले. “आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरी, 17 वर्षांनंतर निकाल येत असेल, तर ते शिक्षा भोगल्यासारखेच आहे. यात हिंदू दहशतवाद नावाची कोणतीही गोष्ट नव्हती”, असे छगन भुजबळ म्हणाले.
