
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर
सुनेत्रा पवार यांनी अर्थ खाते वगळता अजित पवार यांच्याकडे असलेली इतर खाती देण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद होते, तेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र यानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर या शपथविधीवरून टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले की, सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केलं त्यांना संपवण्याचे यांनी काम केले आहे. दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी लाजीरवाणे काम सुरू केले. दादांची राख सुद्दा विजली नाही, शांत होऊ दिली नाही, यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली आहे. 10 दिवस गेले आसते तर काय झाले असते. तटकरे किती चाणाक्ष आणि चालू आहे पहा. शरद पवार हे पक्षाचा ताबा घेतील म्हणून ज्या वहिनीचे कुंकू पुसले, मंगळसुत्र तोडले गेले त्यांना मुंबईत आणले. आपण हिंदु लोक सुतक पाळतो पण इथं काही नाही हे निंदाजनक आहे, क्लेषदायक आहे. ही आपली संस्कृती नाही, सुनील तटकरेंना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही.’ तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी हा शपथविधी इतक्या लवकर कुणी करायला लावला? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच संजय शिरसाट यांनीही अजित पवार यांच्या निधनानंतर खुप लवकर शपथविधी झाल्याचे म्हटले होते.
शिवसेना नेत्यांच्या या विधानावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जो काही वाद होत आहे तो निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ आपलं राजकारण कसं पाहता येईल हा प्रयत्न करत आहे हे अतिशय चुकीच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व व मोठे नेते अजित दादा दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या माध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे.