ते बारच्या सेक्युरिटीचे बॉस होते, तसे शब्द वापरणारच; विजय वडेट्टीवार यांचा रवी राणांना टोला

| Updated on: Apr 26, 2024 | 12:16 PM

कांद्यावरचा निर्यात कर आधी थांबवला होता आणि निर्यात करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी कांदा आयात केला. निर्यातीवर बंदी घातली. कांद्याचे भाव पडले. हमीभावाने कांद्याचे भाव खरेदी केले नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं पाप नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

ते बारच्या सेक्युरिटीचे बॉस होते, तसे शब्द वापरणारच; विजय वडेट्टीवार यांचा रवी राणांना टोला
विजय वडेट्टीवार यांची रवी राणांवर टीका
Follow us on

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्यांची कारकीर्द बारचा सेक्युरिटी गार्ड म्हणून झाली, तो त्याच लेवलला बोलणार. त्यांच्या तोंडात ते शब्द येणे स्वाभाविक आहे. ते डान्सबारच्या सेक्युरिटीचे बॉस होते. अशा व्यक्तीने असे शब्द वापरणे फार मोठी गोष्ट नाही. आपल्या औकातीत राहून बोलले असते तर बरं झालं असतं. ते आपल्या औकातीच्या बाहेर जाऊन बोलतात. 4 तारखेनंतर या राणांची औकात काय आहे ते कळेल, असा हल्ला विजय वडेट्टीवार यांनी चढवला.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना विविध मुद्दयावर भाष्य केलं. दुसऱ्या टप्प्यात जवळपास 88 जागांवर मतदान होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण आठ जागांवर मतदान होत आहे. ईव्हीएम बंद पडण्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मतदार निराश होत आहे. या मशीन बंद कशा पडतात? कारण त्यांची आधी ट्रायल घेतली जाते. यामागे षडयंत्र आहे का? वारंवार मशीन बंद पडतात आणि दुपारी सुरू होतात. मतदार केंद्रावर जाताना परत यावर लागतं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

78 ते 80 जागा मिळतील

पूर्णतः देशांमध्ये इंडिया आघाडीचे वातावरण निर्माण झालं आहे. मोदी सरकार विरुद्ध वातावरण तयार आहे. लोक सरकार बदलण्याची वाट बघत आहेत आणि ती संधी आता मतदारांजवळ आहे. संविधानासाठी गरीब, शेतकरी, बेरोजगारांना आता बदला घेण्याची सुवर्ण संधी आहे. नक्कीच आजच्या निवडणुकीतून मतदार बदला घेतील आणि या फेजमध्येही आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
78 ते 80 जागा आम्ही जिंकत आहोत. सर्वेतून हा आकडा आला आहे. जसजश्या निवडणुका पुढे जातील, तसतसे मोदी सरकारचे पतनाचे दिवस जवळ येतील, असंही ते म्हणाले.

विशाल पाटलांवर कारवाई होणार

सांगलीच्या मुद्द्यावरून त्यांनी विशाल पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला. विशाल पाटील नवीन आहेत. त्यांना पुढे संधी होती. मात्र त्यांनी घाई केली. अति घाई ही फार डेंजर असते. ती घाई त्यांना अडचणीची ठरेल. या वयात थांबून त्यांनी पुढे जाण्याची गरज होती. राजकारणात माझा त्यांना सल्ला राहील की, विशाल पाटील यांनी थांबावं आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी पुढे यावं. त्यांच्या कामाला आणि त्यांच्या मेहनतीला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील, असं त्यांनी सांगितलं. तसेच कारवाई होईलच. पक्षाने आणि आघाडीने ठरवलेल्या नियमाचं उल्लंघन केलं तर कारवाई होत असते. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा नक्की आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ…

नांदेड लोकसभा निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. विजय कोणाचा हे जनता ठरवते. महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मतदान करायचं हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलेलं आहे आणि नांदेडकरांनी सुद्धा ठरवलं आहे. विजय हा महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही ते म्हणाले.