अन् त्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले… आधी नाराज, मग बोलले… काय दिलं उत्तर?

Eknath Shinde : विधान परिषद जागावाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे सुरुवातीला संतापले, मात्र नंतर त्यांनी कांदा प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. अमित शाह यांच्या बैठकीत कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या आंदोलनांना 'स्टंटबाजी' संबोधत शिंदे यांनी शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अन् त्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले... आधी नाराज, मग बोलले... काय दिलं उत्तर?
Eknath Shinde angry on Press
Image Credit source: Google
| Updated on: May 26, 2026 | 6:21 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकूण 17 जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेने 7 जागांवर दावा केल्याने भाजप आणि शिवसेनेतील जागांचा पेच निर्माण झाला आहे. विधान परिषदेचा हा तिढा दिल्लीपर्यंत गेला असून अजून त्यात काही तोडगा निघालेला नाही. तसेच महायुतीचे नेते फक्त चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचंच सांगत असल्याने काहीच माहिती समोर येत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये संभ्रमाचं वातावरण सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबतच्या उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं आहे. अशातच पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेबाबत प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवरच संतापले. शिंदे पहिल्यांदाच वैतागलेले दिसल्याने पत्रकारांना आश्चर्य वाटलं.

विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांवरच संताप व्यक्त केला. एकीकडे बाईट घेण्यासाठी कॅमेरामनची गडबड आणि त्यात विधान परिषदेचा प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे निघून गेले. मात्र, काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यावर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेपासून ते कांद्याच्या प्रश्नापर्यंतच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली.

अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे संवेदनशील असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीत निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कांदा खरेदी केंद्रे सुरू केली असून सध्या 15 रुपये 80 पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

ही स्टंटबाजी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारला पूर्णपणे माहीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत अमित शाह यांच्याकडून यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं सांगतानाच विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आणि मीडियात झळकण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला जात आहे. ही शेतकऱ्यांच्या हिताची लढाई नसून निव्वळ स्टंटबाजी आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

काँग्रेसच्या सत्ताकाळातही कांद्याने जनतेला रडवले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली नव्हती. आज मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एकनाथ शिंदे संतापले

Follow Us