आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला
Crime News : जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील एका व्यक्तीने आपल्या 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपनल्याची घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्नीसोबत वाद झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल विजय यांचे आपल्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे विजय यांची पत्नी मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विजय चिंतेत होते. आज सकाळी विजय यांना आपल्या मुलांना चहा करून पाजला. त्यानंतर ते घरातील घरकाम करत असताना त्यांच्या वडिलांनी, तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली? असं विचारलं.
आधी मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर आत्महत्या
वडिलांनी विचारल्यामुळे विजय यांना आणखी मानसिक त्रास झाला आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्या चारही मुलांना घेत जवळची विहीर गाठली. त्यानंतर त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलांना विहिरीत टाकल्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीच्या कडेला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वजनामुळे दोरी तुटली आणि हेही विहिरीत पडले. त्यामुळे पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात
या घटनेच्या काही वेळानंतर शेताचे मालक तिथे आले असता, त्यांना विहिरीच्या काठावर मोबाईल, चपला आणि कापलेली दोरी आढळून आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांना मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.