Devendra Fadnavis : मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यावरुन विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु होते.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यावरुन विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु होते. देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मागच्या महिन्याभरापासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, तिथे मंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून ही चर्चा जास्त जोरात सुरु झाली. पण आज स्वत: फडणवीस यांनीच स्पष्ट केलं की, ‘मी महाराष्ट्रातच राहणार आहे’ संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याचकाळात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा आहेत.
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असं सतत बोललं जातय. पण मुख्यमंत्र्यांनी स्वत:च महाराष्ट्रात राहणार असल्याचं सांगितलं आहे. काल पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना हाच प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणालेले की, ‘जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी सुद्धा त्यांची ओळख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. त्यांची संपूर्ण राज्याच्या राजकारणावर पकड आहे. भाजपचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आकाराला आले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. कारण फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक पायाभूत सोयी-सुविधांचे प्रकल्प आकाराला आलेत. काल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं. नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला.
