monsoon update : अल् निनो नाही तर यामुळे महाराष्ट्र पाऊस येईना; पहिल्यांदाच मोठं कारण समोर, हवामान विभागाने चिंता वाढवली
राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे, मात्र अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मान्सून तळ कोकणातच अडकला आहे. सर्वांचे डोळे पावसाकडे लागलेले असतानाच आता भारतीय हवामन विभागाचा (IMD) नवा अंदाज समोर आला आहे.

जून महिना संपत आला आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचा पाऊस झाला नसल्यानं चिंता वाढली आहे. सर्वांचेच डोळे आता पावसाकडे लागले आहेत. पाऊस लांबल्यामुळे राज्यभरात पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच सुरुवातीला ज्या भागात पाऊस झाला, त्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसाने ओढ दिल्यामुळे त्यांची देखील चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज आता समोर आला आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येत्या 25 जूननंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून, जोरदार पावसाची शक्यता आहे. पुन्हा एकदा कोकणातून पावसाला सुरुवात होईल, असं हवामान विभागनं म्हटलं आहे.
काय आहे हवामान विभागचा नवा अंदाज?
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येत्या 25 जूनपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिया होणार असून, कोकणात दमदार पावसाची शक्यता आहे. 25 जूनपासून कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. अरबी समुद्रातील मान्सूनचे वारे पुढे ओढणारी सोमाली जेट ही वायू प्रणाली कमकुवत झाल्यानं मान्सून रखडला असल्याची माहिती देखील यावेळी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तान आणि वायव्य कडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवासात अडचण निर्माण झाली आहे. यावर्षी जून महिन्यात आतापर्यंत राज्यात फक्त सरसरीच्या 66.70 मिलिमीटर एवढाच पाऊस पडला आहे. तर गेल्यावर्षी जून महिन्याच्या 20 दिवसांत 634. 10 मिमी पावसाची नोंद झाली होती, म्हणजे जवळपास 19 टक्के पाऊस झाला होता, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 25 जूनच्या आसपास मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे, कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच भागांमध्ये येत्या 25 जून ते 30 जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान चांगला पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पेरणीची घाईल केल्यास दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. दरम्यान यंदा ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस होऊ शकतो असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.