El Nino : एल निनोचा राक्षस पावसाला गिळून घेणार, IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज आला!
डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे.

El Nino Prediction : देशावर सध्या एल निनोचं महासंकट आहे. या एल निनोमुळेच देशात मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही उशिराने मान्सून दाखल झाला. अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कोणतीही घई न करता चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारकडून सांगितले जात आहे. सोबतच दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, आता एली निनोच्या महासंकटाविषयी नवा आणि चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. आयएमडीच्या प्रमुखानीच याविषयी सविस्तर सांगितले आहे.
एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम
एल निनो या जून महिन्याच्या सुरुवातील प्रशांत महासागरात सक्रिय झाला आहे. नव्या अंदाजानुसार आता एल निनोचा प्रभाव सप्टेंबर महिन्यानंतर जास्त वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी याविषयी माहिती दिली आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान…
डॉ. महापात्र यांच्या मतानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा राहील. त्यानंतर एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. हवामान विभागाचे याकडे पूर्ण लक्ष आहे. सोबतच जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान विभागाकडून शेतकरी तसेच सामान्यांना माहिती देत राहू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे…..
दरम्यान, डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे. ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बियाणांची अपलब्धता, जलव्यवस्थापन, पर्यायी पिके यावर सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे.