काळी बाहुली-लिंबू आणि सुया, सरपंचपदाच्या पोट निवडणूकीत भानामतीच्या प्रकाराने दहशत
पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सांगली जिल्हा हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी भानामती आणि जादूटोणा सारखे प्रकार घडत आहेत. नाशिकचे अशोक खरात सारखे भोंदूबाबाचे प्रकरण ताजे असताना असे अंधश्रद्धेचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गावपातळीवरील सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीदरम्यान भानामतीचा प्रकार घडल्याने गावातील लोक घाबरले आहेत. सरपंच पदाच्या उमेदवाराच्या शेताशेजारील जागेत फोटोवर हळद कुंकू, काळ्या बाहुल्या आणि लिंबांना सुया टोचून काळे कापड टाकून भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी गावात घडला आहे. या प्रकारामुळे वड्डी गावात दहशतीचे वातावरण असून गावकरी भयभयीत झाले आहेत.
निवडणुका चालू झाल्या की निवडणुकीच्या प्रचाराबरोबर उमेदवारावर काळी जादू आणि भानामतीचे प्रकार देखील अनेक ठिकाणी घडत असतात. प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्यासाठी करण्यासाठी करणी करणे,जादूटोणा करणे अशा गोष्टींचा वापर करण्याचे प्रकार आता वाढू लागला आहे. अशाच पद्धतीचा एक भानामतीचा प्रकार सध्या सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी गावामध्ये समोर आला आहे.
मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक सध्या सुरु आहे. या पोटनिवडणुकीमध्ये जन सुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर हे निवडणूक लढवत आहेत. प्रचाराचा अंतिम टप्पा सध्या पार पडत आहे. वेगवेगळ्या पातळीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराचा धडाका उडवून देण्यात येत असताना गावात करणीचा आणि भानामतीचा विचित्र प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच पदाचे उमेदवार असणारे राजू वजीर यांचा फोटो वापरून विरोधकांनी करणी भानामती केल्याचे उघडीकीस आले आहे. वजीर यांच्या फोटोवर काळी बाहुली कापड, केळी, लिंबू हळद-कुंकू, लिंबाला सुया टोचणे असा प्रकार घडला आहे.
भानामतीचे साहित्य जाळले
या घटनेनंतर उमेदवार वजीर यांच्या समर्थकांनी हा प्रकार पाहताच येथील भानामतीचे सर्व साहित्य पेट्रोलने जाळून टाकले असल्याचे माजी उपसरपंच कल्लपा नाईक यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदवला आहे. वजीर यांचा विजय निश्चित असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने अशा पद्धतीचे कृत्य करण्यात आल्याचे वजीर यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.
केवळ अंधश्रद्धा आहे – अंनिस
भानामती सारखे केले जाणारे प्रकार हे केवळ अंधश्रद्धा असून त्यामुळे समोरच्यावर भीती निर्माण करण्याचा प्रकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायद्यांतर्गत व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा कोणत्याही भानामतीच्या प्रकाराला घाबरून जाऊ नये,असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली अध्यक्ष राहुल थोरात यांनी केले आहे.
