एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अन् देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री? भाजपच्या बड्या नेत्याने दिली सर्वात मोठी अपडेट
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळावी आणि एकनाथ शिंदेंकडे राज्याचे नेतृत्व यावे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कडू यांनी म्हटले की, ‘राज्याचा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असावा, ही प्रत्येक शिवसैनिकाची प्रामाणिक भावना असू शकते. तसेच देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळावी आणि शिंदेंकडे राज्याचे नेतृत्व यावे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार?
बच्चू कडू यांच्या विधानावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, 51% बहुमत महायुतीला मिळालं आहे, सर्वात मजबूत सरकार आहे, आम्ही एकत्र आहोत. देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे हा निर्णय करण्याचा अधिकार कोणाला नाहीये. देवेंद्र फडवणीस यांना विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून देशातील सर्वात अव्वल राज्य तयार करायचे आहे. देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे हा विचार कोणी करू नये. असे गावा गावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये.
प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा…
बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, प्रत्येकाला वाटते आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. महायुतीमध्ये एकमताने देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री बनलेले आहेत. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला पाहिजेत असं समन्वय समितीमध्ये ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये ठरलेला निर्णय कोणी पाळत नसेल तर त्यावर चर्चा करू.
मलाही वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत – सामंत
बच्चू कडू यांच्या विधानावर बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. अशी मागणी स्वाभाविक मागणी आहे, माझीही मागणी आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे तशीच आमची मागणी असते, बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होती त्या केल्या आहेत.