Nilesh Chandra : महाराणी ताराराणी यांच्याबाबत एका जैन मुनीचं वादग्रस्त वक्तव्य, दुसऱ्या जैन मुनीने मागितली माफी
Nilesh Chandra : "या वक्तव्यामुळे तारा राणी यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी नमूद केले आहे. नयपद्य सागर यांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मार्ग दाखवावा लागेल"

महावीर जयंतीच्या दिवशी एका कार्यक्रमात जैन मुनी नयपद्य सागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराणी ताराराणी या जैन असल्याचं नयपद्यम सागर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोर नयपद्य सागर यांनी हे वक्तव्य केलं. म्हणून काल संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी नयपद्य सागर यांच्या वक्तव्यासाठी महाराष्ट्रातील जनता आणि मराठ्यांची माफी मागितली आहे. संबंधित वक्तव्य हे जैन समाजाचे नसून नयपद्य सागर यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले आहे.
या वक्तव्यामुळे ताराराणी यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी नमूद केले आहे. नयपद्य सागर यांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मार्ग दाखवावा लागेल असा इशाराही मुनी निलेश चंद यांनी दिला आहे. नयपद्य सागर यांच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व संस्थांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राज्यात सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्र संत मुनी निलेश चंद्र यांनी ताराराणींचा काय इतिहास सांगितला?
“नयन पद्मसागर यांनी सर्वप्रथम इतिहास वाचला पाहिजे. ताराराणी कोण होत्या?. ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. त्याचं नाव ठेवलं ताराबाई. त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झालं. त्यांनी भरपूर सारी युद्ध लढली. म्हणून जनतेने त्यांना ताराराणीची उपाधी दिली. ताराबाई यांचा जन्म 1675 साली तळ बीड मध्ये झाला. त्यांचा मृत्यू 1761 साली सातार जिल्ह्यात झाला. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी विरोध करतो. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी याचा विरोध केला पाहिजे” असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले.
“चारही बाजूंनी मोगलांनी मराठा साम्राज्याला घेरलं होतं. चिंतेचा विषय होता. मराठा साम्राज्याला वाचवायचं कसं? ताराबाई सरसेनापती हंबीरराव मोहित यांची पुत्री होती. युद्धकला आणि सनातन धर्म लहानपणापासून अंगी होता. राजाराम यांच्या मृत्यूनंतर ताराराणी मोगलांशी लढल्या. दुर्गा बनून मुघलांवर तुटून पडल्या. महाराष्ट्राच्या जनतेने ताराबाईंना ताराराणी बनवलं. ही ताराबाईंचा इतिहास आहे” असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितलं.
