Sanjay Raut : हंबीरराव मोहिते जैन होते का? ताराराणी स्वराज्यासाठी लढल्या, लोढा टॉवरसाठी नाहीत, संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : "तुम्ही मुंबई आणि पुण्यासारखी शहर जैन संस्कृतीच्या अमलाखाली आणलेली आहेत. सर्वत्र जैन फूड आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे महाराष्ट्रात होऊ शकतं"

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतहाला मराठी किंवा मराठा समजतात. त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर साधा निषेध केला नाही. महाराणी ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला. त्यांना असं का वाटलं? मला माहित नाही. त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांना असं वाटलं असेल. महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत. हंबीरराव मोहित हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची ताराराणी कन्या. ताराराणी यांनी औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली. म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का? हिंदू मराठा कुळात ताराराणी यांना जन्म झाला. शास्त्र जन्माला जागून त्यांनी तलवार आपल्या हातात घेतली. संपूर्ण महाराष्ट्राच एकप्रकारे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार राजवटीत सुरु झालेला दिसतो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“धर्मांतर विरोधी कायदा आणलेला आपण महाराष्ट्रात. तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुम्ही आमच्या ताराराणींच जबरदस्तीने धर्मांतर करताय.याच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. तुम्ही आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्येच ताराराणीचं, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचं, झुंजार वीरांगना ताराराणी यांचं अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा अधिकार कोणी दिला? यामागे काय षडयंत्र आहे?” असे सवाल संजय राऊत यांनी विचारले.
‘एकनाथ शिंदे यांनी ताराबेन ऐकलं असेल’
“पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, महाराणी यांना तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची विचारधारा, विकृती कोणत्या थराला गेली आहे. कुठे गेल्या आता मराठा संघटना? मराठी अस्मितेचे आमचे सहकारी. ताराराणी विषयी अशी वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करुन चालणार नाही. सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिथे उपस्थित होते. त्यांनी तिथे साधा ब्र काढला नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहित नसेल त्यांनी ताराबेन ऐकलं असेल. पण त्या ताराराणी आहेत. हंबीरराव मोहिते यांची कन्या आहे ती. शूर वीर राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले” असं संजय राऊत म्हणाले.
मंगल प्रभात लोढांना ताराराणी यांचा इतिहास माहित आहे का?
मंगल प्रभात लोढा या विधानामागे आहेत असं म्हटलं जातय. त्यावर राऊत म्हणाले की, “मंगल प्रभात लोढांना ताराराणी, महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे का?. ताराराणी या स्वराज्यासाठी लढल्या. लोढा टॉवर उभारण्यासाठी लढल्या नव्हत्या. ट्रम्प टॉवरला संरक्षण देण्यासाठी लढत नव्हत्या. त्या हिंदू मराठा साम्राज्यासाठी ताराराणी यांचा संघर्ष होता”
