राज्यात पुन्हा बसचा अपघात, कार, बाईकला धडक; 6 जणांचा जागीच अंत
जळगाव, सांगली, सोलापूर आणि पुण्यात भीषण अपघातांचे सत्र सुरु आहे. जळगावात तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूर व सांगलीमध्ये नागरिकांचा थरार पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात अपघातांच्या अत्यंत धक्कादायक घटना समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यात कार, एसटी बस आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर सांगलीत मद्यधुंद चालकाने धुमाकूळ घातला असून सोलापूर आणि पुणे महामार्गांवरही थरारक अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
जळगाव: अमळनेर-धुळे रस्त्यावर तिहेरी अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक अतिशय भीषण अपघात झाला. अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ असलेल्या हॉटेल वृंदावन जवळ कार, एसटी बस आणि मोटरसायकल दरम्यान तिहेरी धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा पार चक्काचूर झाला.
या अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि एसटी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत दुचाकीस्वारासह कारमधील महिला आणि पुरुष मिळून एकूण ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाल्याने मृतदेह आतमध्ये अडकले होते, ज्यांना गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मोठ्या शर्थीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
सांगलीत मद्यधुंद चालकाचा थरार; कारसह महापालिकेच्या कारंजाचे नुकसान
सांगलीच्या मिरजेत भरदिवसा एका मद्यधुंद सुमोचालकाने शंभर फुटी रोडवर जोरदार धुमाकूळ घातला. शुभम राजेंद्र गायकवाड असे या चालकाचे नाव असून, तो मद्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने निघाला होता. त्याने सुरेश लक्ष्मण नांदरेकर यांच्या चार चाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
एवढ्यावरच न थांबता त्याची सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर जाऊन आदळली, ज्यामध्ये कारंजाचे मोठे नुकसान झाले. अपघात करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या चालकाला सतर्क नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ब्रेक फेल झाल्याने दुचाकीस्वाराला फरफटत नेले
जळगावच्या अजिंठा चौफुलीवर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक थरारक अपघात घडला. एका मालवाहू वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार उडवले.
यातील एका दुचाकीसह दुचाकीस्वाराला या मालवाहू वाहनाने आपल्या समोरच्या चाकात अडकवून तब्बल ३०० ते ४०० मीटर अंतरापर्यंत महामार्गावर फरफटत नेले. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार या भीषण अपघातातून सुखरूप वाचला आहे. मात्र, या घटनेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून एका दुचाकीस्वाराच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे.
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
सोलापूर-बार्शी राज्य मार्गावरील कारंबा गावाजवळ डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. कारंबा गावचे रहिवासी असलेले दोन जण सकाळी दुचाकीवरून शेतात जात असताना एका ट्रकने (डंपर) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त ट्रक जागीच पेटवून दिला. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यात एसटी बस गटारात कोसळली; मोठी जीवितहानी टळली
पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याजवळ खोपी गावाच्या हद्दीत साताऱ्याहून मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाणारी एक भरधाव एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या कडेच्या गटारात कोसळली. ही बस मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) यांच्या मधोमध असणाऱ्या गटारात जाऊन अडकली. सुदैवाने बस पूर्णपणे पलटी न झाल्याने एक मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्गावरील इतर प्रवाशांनी तातडीने मदत करत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
