गावातील अनेकांना पिण्याच्या पाण्यामुळे जडले किडनींचे आजार, काही जणांची किडनी निकामी
गावातील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकांना किडनीचा विकार झाल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एका पाठोपाठ जेव्हा अनेकांना किडनीचा, मुतखड्याचा त्रास जाणवून लागला तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. गावातील पाणी क्षारयुक्त असल्यामुळे गावातील अनेक रुग्णांच्या किडन्या खराब झाल्या.

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव गावात अनेक ग्रामस्थांना किडनीच्या विकारांची लागण झाली आहे. या आजारामुळे गेल्या सहा वर्षांत चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे किडनीचा विकार जडल्याचे डॉक्टरांकडून सांगितल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
चोपडा तालुक्यातील चौगाव गावात अनेक नागरिकांना किडनीच्या विकाराची, मुतखड्याची लागण असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नेमका प्रकार काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने चौगाव गाठले. गावातील सर्वांची माहिती घेण शक्य नसल्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात काही ग्रामस्थांकडून , ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर जी माहिती समोर आली, ती सर्वाचे डोक चक्रावणारी अशीच आहे.
चोपडा तालुक्यातील चौगाव या गावात प्रत्येक घरामागे एका घरात किडनीचा विकाराचा, मुतखड्याचा रुग्ण असल्याचे गंभीर वास्तव आहे. काही जणांना दोन वर्षांपासून तर काही जणांना सात ते आठ वर्षांपासून किडनीचा आजार झाला आहे. सुरुवातील रुग्णांना उलटी होणे, अवयवांना सुज येणे, अशी लक्षणे दिसली. त्यानंतर संबंधित रुग्णांनी ॲसिडीटी असावी, म्हणून दुर्लक्ष केले. मात्र पोटात अन्नाचा कण राहत नसल्याने रुग्णालय गाठले. तपासण्या केल्यानंतर किडनीला सूज, किडनीचा विकार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी पाण्यामुळे आजार झाल्याचे म्हटले आहे. अचानक किडनीच्या विकारावर उपचार करताना हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आल्याने अनेकांवर आली आहे.
चौगाव गावातील अशोक भावसिंग राजपूत या शेतकऱ्याची २०१८ मध्ये अचानक प्रकृती बिघडली. ताप येत होता. यासह वेगवेगळी लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान केले. हे समजल्यावर अशोक राजपूत यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला. कुठलेही व्यसन नसताना अचानक किडनीचा आजार जडला कसा? असा प्रश्न सर्व कुटुंबियांना पडला. आठवड्यात दोन वेळा डायलिसीस करत, उपचार केले. १७ ते १८ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र कुटुंबियांना अपयश आले. २०२० मध्ये अशोक राजपूत यांचे निधन झाले. अशोक यांच्या भावाचाही त्यांच्याप्रमाणेच किडनीच्या विकाराने मृत्यू झाला.
ग्रामस्थांबरोबरच गावातील उपसरपंच सुध्दा किडनीच्या आजारापासून वाचले नाही. संतोष पाटील हे चौगाव गावचे उपसरपंच आहेत. पुण्यातून जेव्हा गावाकडे पतरले त्यानंतर काही दिवसांनी त्यांना मुतखड्याचा त्रास जाणवू लागला. मुतखड्याच्या त्राासामुळे एक नव्हे, दोनदा त्यांचा ऑपरेशन करावे लागले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरात फिल्टर प्लॅट बसून घेतला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कारण त्यांच्या आई, मुलगा तसेच मुलीला सुध्दा किडनीचा विकार जडला होता.
६० टक्के लोकांना किडनीचा विकार
गावातील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकांना किडनीचा विकार झाल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एका पाठोपाठ जेव्हा अनेकांना किडनीचा, मुतखड्याचा त्रास जाणवून लागला तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. गावातील पाणी क्षारयुक्त असल्यामुळे गावातील अनेक रुग्णांच्या किडन्या खराब झाल्या.
गावात ग्रामस्थांना मोफत शुध्द पाणी मिळावे, म्हणून फिल्टर प्लँट बसविण्यात आला. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. सर्वच पाण्याचे स्त्रोत क्षारयुक्त झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता खरोखर पाण्यामुळे ग्रामस्थांना किडनीचे विकार होताहेत की अन्य कारणांमुळे याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
