गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? शिवसेना आमदाराचा मोठा दावा

| Updated on: Jun 06, 2023 | 4:40 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी जळगावातून समोर आली आहे. शिंदे गटाच्या आमदाराने मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय-काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? शिवसेना आमदाराचा मोठा दावा
फाईल फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा भरोसा नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकार काळात मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या पक्षात मोठी फूट पडली. मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारत सत्तांतर घडवून आणलं. ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारानेच मोठा दावा केला आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पुढच्या काही वर्षात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा शिंदे गटाच्याच आमदाराने केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी नेमक्या कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“गेल्या 25 वर्षात आमदार, जिल्हाप्रमुख, उपनेते, नेते, राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री असा गुलाबराव पाटील यांचा प्रवास मी पाहतोय. उद्या कदाचित गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री होतील की काय याचं मनावर दडपण आहे”, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी केलंय. गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं तर त्यांच्यासह माझेही पाय कापायला सुरुवात होईल, असेही सूचक वक्तव्य किशोर पाटील यांनी यावेळी केलं.

किशोर आप्पा पाटील नेमकं काय म्हणाले?

“गेल्या 20-25 वर्षांपासून आपण पाहतोय. आम्हाला शिवतीर्थानंतर या जळगाव जिल्ह्यात कोणती पर्वणी असेल तर तो 5 जूनचा गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस. हा दिवस आमच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेला आहे. त्याचं चित्र आज आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो, गुलाबरावांना शुभेच्छा देतोय. मी गुलाबराव पाटील आमदार असताना इथे आलेलो आहे, ते जिल्हाप्रमुख असताना आलेलो आहे, उपनेते, नेते असताना आलेलो आहे, आज माझं भाग्य आहे की, गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री असताना मी त्यांच्या वाढदिवसाला आलेलो आहे”, असं किशोर आप्पा पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला यापुढे शुभेच्छा देताना थोडं घाबरावं लागेल. कारण कॅबिनेट मंत्रीपदाचं पुढचं पद हे फक्त मुख्यमंत्रीपद आहे. जर ते मुख्यमंत्रीपद मी या ठिकाणी जाहीर केलं तर तिकडून सगळ्यांनी मिळून त्यांच्यासहीत माझे पाय कापायला सुरुवात होणार आहे”, असं किशोर आप्पा म्हणाले.

“राज्यमंत्री असताना मी तुम्हाला आवाहन करायचो की, आज भाऊ राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचा पूर्ण अधिकार आहे. पुढे त्यांना कॅबिनेटमंत्री म्हणून पाहायचं. या मतदारसंघाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आतापर्यंत भाऊ आमचे शिवसेनेचे नेते होते. आमचे प्रमुख होते”, असं किशोर आप्पा आपल्या भाषणात म्हणाले.

“आता मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा दिवंगत मंत्री तात्यासाहेब पाटील यांना पाणीवाले बाबा हे पद मिळालं होतं. त्यांची दूरदृष्टी होती की, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जायला हवं. मला आज अभिमानाने सांगावसं वाटतं की, तात्यासाहेबांचं स्वप्न गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केलं. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत, महाराष्ट्रात तहानलेल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम गुलाबराव पाटील यांनी केलं”, असाा दावा आमदार किशोर आप्पा यांनी केला.